सोलापूर : एका डुलकीने घेतला पाच जणांचा जीव

पंढरपूरहून अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात
भीषण अपघातात चक्काचूर झालेली गाडी घेऊन जाताना क्रेन.
भीषण अपघातात चक्काचूर झालेली गाडी घेऊन जाताना क्रेन.Sakal

सोलापूर - मिरज येथून पंढरीच्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन नऊजण चारचाकीतून अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात होते. त्यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ त्यांच्यावर काळाने घाला घातला. चालकाला डुलकी लागली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. सोलापूर-हैदराबाद महामार्गावर थांबलेल्या ट्रकला चारचाकीने मागून जोरात धडक दिली. या अपघातात पाचजणांचा मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हुबळी येथील शितोळे कुटुंबीय शनिवारी (ता. २३) मिरज येथील नातेवाईक जाधव यांच्या मिरजेतील घरी गेले. रविवारी (ता. २४) रात्री नऊजण इनोव्हा गाडीतून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. सोमवारी (ता. २५) विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते दुपारच्या सुमारास अक्कलकोटला निघाले.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आली. दुपारच्या सुमारास महामार्गावर वाहनेही कमी होती. त्यामुळे इनोव्हा चालकाने गाडीचा वेग कमी केला नाही. बाजार समिती दीडशे मीटर अंतरावर असतानाच अलिकडे महामार्गावर एका बाजूला थांबलेल्या ट्रकला इनोव्हाने मागून जोरात धडक दिली. यात पाचजणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोक लगेचच तेथे दाखल झाले. पोलिसही काहीवेळात त्याठिकाणी आले आणि त्यांनी जखमींना पहिले बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले.

आई बचावली अन्‌ पतीसह दोन्ही मुलांचा मृत्यू

पंढरपूरहून दर्शन घेऊन अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या चारचाकी इनोव्हाचा भीषण अपघात झाला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकजण हुबळी येथील असून चौघेजण मिरज येथील आहेत. सचिन शितोळे (वय ३५, रा. हुबळी, जि. धारवाड), दिलीप जाधव (वय ३५, रा. मिरज), सोनाबाई जाधव (वय ५५, मिरज), लाडू दिलीप जाधव (वय ३) व गौरी दिलीप जाधव (वय ८) यांचा अपघातात मृत्यू झाला. तर वर्षा सचिन शितोळे, रेखा दिलीप जाधव, ईशा जाधव व विनायक देवकर हे चौघे जखमी झाले आहेत. दुख:द बाब म्हणजे या अपघातात दिलीप जाधव यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर काळाने घाला घातला. तर त्यांची पत्नी रेखा या बचावल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ट्रक चालकाला घेतले ताब्यात

शहरातील जडवाहतूक रात्री नऊनंतर सुरु असते. जड वाहतूक बंद असल्याने तो ट्रकचालक सोलापूर-हैदराबाद महामार्गावर एका बाजूच्या लेनवर थांबला होता. ट्रक चालक गाडी थांबवून आतमध्ये झोपलेला होता. मोठ्याने आवाज होऊन आपली गाडी पुढे गेल्यासारखे त्याला वाटले आणि तो उठला. त्याला जोडभावी पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भीमराव गुदले असे त्या ट्रकचालकाचे नाव असून तो बडोद्यावरून बंगळुरूला निघाला होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली.

बोनेट आले मागील सिटापर्यंत

पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे यांनी अपघात झालेल्या ठिकाणी भेट दिली. इनोव्हा चालकाने अपघातापूर्वी ब्रेक दाबल्याची घटनास्थळी कुठेही खूण नाही. १४० च्या वेगाने चारचाकी त्या थांबलेल्या ट्रकच्या मागील बाजूस घुसली. त्यामुळे इनोव्हा गाडीचे दोन्ही सीट्‌स मागील बाजूच्या सीटापर्यंत आले होते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. इनोव्हातील नऊ जणांपैकी पाचजणांचा मृत्यू झाला असून त्यात एका तीन वर्षीय तर एका दहा वर्षीय मुलीचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com