Solapur : कांद्याने केला वांदा! खाणारे मजेत, शेतकरी चिंतेत

किरकोळ बाजारात नवा माल आला तरीही जुन्याची विक्री २० रुपये किलोच
onion
onionsakal

सोलापूर : यंदा कांद्याने पुन्हा वांदा केला असून, नवा कांदा बाजारात येऊ लागला तरी जुन्या कांद्याची विक्री फक्त २० रुपये किलोने सुरू आहे. ठोक बाजारात शेतकऱ्यांच्या पदरात दहाच रुपये पडत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.कांदा हा नाशवंत माल असल्यामुळे कांद्याचे दर कधीही स्थिर नसतात. कधी खाणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो तर कधी पिकविणाऱ्यांच्या.

मागील वर्षभरात कांद्याचा दर किरकोळ बाजारात २० ते ३० रुपये किलोच्या दरम्यान राहिला आहे. तर कांदा उत्पादकांच्या पदरात क्विंटलला फक्त एक हजार ते दीड हजार रुपये मिळाले आहेत. दरवर्षी जुलै- ऑगस्टमध्ये सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात कांदा लागवड केली जाते. नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने आपल्या कांद्याला दर मिळेल, या आशेने शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करतात. यावर्षी नाशिकसह सर्व महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळे यंदा लागवडीचे क्षेत्र घटले आहे. तरीही जुन्या कांद्याची बाजारात येण्याची आवक मोठी असल्याने अजून तरी नव्या कांद्याला म्हणावा तसा दर मिळत नाही. आजही सोलापूर शहरातील किरकोळ बाजारात कांदा फक्त २० ते ३० रुपये किलोने विकला जात आहे. यामुळे नव्या कांद्याला दर किती मिळणार, याबाबत शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

कांदा पिकासाठी होणारा एकरी खर्च (अंदाजे)

बियाणे - एकरी २ किलो, ३,२०० रुपये

रोपवाटिका मजुरी - २,५०० रुपये

वाफा तयार करणे बैलजोडी - २००० रुपये

लागवड मजुरी एकरी : १०,००० रुपये

दोन वेळा खुरपणी - ५,००० रुपये

भेसळ डोस खत : १०,००० रुपये

कीटकनाशक फवारणी : ५,००० रुपये

कांदा काढणी मजुरी - १०,००० रुपये

कांदा प्रती पिशवी - ३० रुपये

वाहतूक - ३,००० रुपये

अंदाजे खर्च एकरी - ५०,००० रुपये

कांद्याचे एकरी उत्पादन अंदाजे ५० क्विटंल होते. यामुळे एक हजार ते दीड हजार रुपये दराने कांदा उत्पादन घेणे शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे आहे. कांद्याला किमान प्रतिक्विंटल तीन हजार रुपये दर असेल तरच परवडते; अन्यथा पदरमोड करण्याचीच वेळ येते. यात नैसर्गिक आपत्ती आल्यास होणारे नुकसान वेगळेच आहे.

- धनाजी चव्हाण, कांदा उत्पादक, रानमसले

अतिवृष्टीमध्ये कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. लागवडीचा खर्च, खतांचे व मजुरीचे वाढलेले दर, पडलेले कांद्याचे भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. झालेला सर्व खर्च पाहता ४० ते ५० रुपये किलो दराने कांद्याची विक्री व्हावी, तेव्हाच शेतकऱ्यांना चार पैसे मिळू शकतील.

- दत्तात्रय लंगोटे, कांदा उत्पादक, पिंपरी (आर), ता. बार्शी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com