सोलापूर : करवाढीमुळे वाढणार घरभाडे

बांधकामाचे आयुष्य व क्षेत्रानुसार करआकारणी
सोलापूर महापालिका
सोलापूर महापालिकाsakal

सोलापूर: अंदाजपत्रकानुसार महापालिकेच्या महसुलात ८० कोटींची वाढ अपेक्षित आहे. शहरातील एक लाख २९ हजार मिळकतदारांना मालमत्ता कराची नोटीस काढण्यात आली आहे. पूर्वी चार हजारांचा कर भरावा लागत होता, आता त्याच मिळकतदाराला १२ हजारांची पावती आली आहे. घरमालकाने पूर्वी भाडेकरार करताना चार ते १२ हजारांपर्यंत भाडे निश्चित केले आहे. पण, आता महापालिकेच्या करवाढीनंतर भाडेकरार नव्याने होतील, अशी स्थिती आहे.

महापालिकेला मागील आठ-दहा वर्षांत उद्दिष्टाच्या तुलनेत नेहमीच उत्पन्न कमी मिळाले आहे. अंदाजपत्रकानुसार मागील काही वर्षांत ही तूट एक हजार कोटींपर्यंत पोचली. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या मोठ्या प्रकल्पांचा हिस्सा भरायला सुद्धा महापालिकेकडे पैसे नाहीत. दुसरीकडे, अनेक शासकीय योजनाही त्याच कारणामुळे रखडल्या. काही वर्षांत टॅक्स वाढ न झाल्याने २०१६-१७ मध्ये सॅटेलाईटद्वारे शहरातील मालमत्तांचा सर्व्हे झाला. पण, त्याची अंमलबजावणी आता केली जात आहे.

त्यामुळे तक्रारींत वाढ होत असल्याची स्थिती आहे. २०१७ ते २०२२ या काळात शहरातील अनेक मालमत्तांमध्ये बदल झाला आहे. तरीही, त्यांना त्यावेळच्या सर्व्हेनुसार टॅक्स आकारण्यात आला आहे. अनेकांचे साधे घर असतानाही त्यांना शेजारील पक्क्या घरांप्रमाणे टॅक्स आकारला आहे. इमारत तथा बांधकामाचे आयुष्यमान, त्या जागेवरील एकूण बांधकाम, अशा बाबींवर ही करआकारणी केली आहे. शहरातील सर्वच मिळकतींचा टॅक्स वाढला असून त्यातून वर्षाकाठी करातून महापालिकेला वाढीव ८० कोटी मिळणार आहेत. पण, आता घरमालकांना पूर्वीच्या भाडेकरारात बदल करून भाडे वाढवावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अर्धवट पत्त्यांमुळे कर्मचाऱ्यांची वणवण

शहरातील एक लाख २९ हजार मिळकतदारांना घरोघरी जाऊन टॅक्सची पावती दिली जात आहे. काही पावत्यांवर पूर्ण पत्ते नसल्याने त्या व्यक्तीचे घर शोधण्यात कर्मचाऱ्यांची पंचाईत होत आहे. मिळकतदारांना वेळेत बिले पोच व्हावीत म्हणून आयुक्त पी. शिवशंकर यांनी कर्मचाऱ्यांना बिल वाटपाचे टार्गेट दिले आहे. पण, वेळेत बिलांचे वाटप न करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कारवाईची नोटीसही काढली आहे.

२१ दिवस म्हणजे नागरिकांची डोकेदुखी

मिळकतदारास टॅक्स आकारणीची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी पुढील २१ दिवसांत त्यांची तक्रार किंवा आक्षेप नोंदविणे अपेक्षित आहे. पण, उन्हाळा सुटीमुळे शहरातील अनेकजण काही दिवसांसाठी सुटीवर गेले आहेत. घर बंद असल्याने त्यांच्या भिंतीवर नोटीस लावली जात आहे. दरम्यान, अजूनही जवळपास ९० हजार मिळकतदारांना नोटीस गेलेली नाही. घर बंद असलेल्यांना उशिरा नोटीस मिळाली आणि तोवर मुदत संपल्यास त्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे आयुक्त अशा लोकांसाठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com