मुसळधार झालेल्या पावसाने जवळगाव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून, ओव्हर फ्लो झाला आहे.
वैराग (सोलापूर) : गेल्या चार - पाच दिवसांपासून उत्तरा नक्षत्रातातील पावसाचा लपंडाव सुरू असताना गुरुवारी (ता. 23) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वैराग व परिसरात जोरादार वादळी वाऱ्यासह पावसाचे (Heavy Rain) पुनरागमन झाले. मुसळधार झालेल्या पावसाने जवळगाव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून, ओव्हर फ्लो झाला आहे. गुरुवारी सायंकाळी बार्शी (Barshi) तालुक्यात पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .
मंडळ निहाय पाऊस : मिलिमीटरमध्ये
बार्शी - 46, अगळगाव - 21, वैराग - 55, पानगाव - 55, सुर्डी - 15, गौडगाव - 57, पांगरी - 33, नारी - 79, उपळे दु. - 42, खांडवी - 11. सरासरी एकूण पाऊस - 417 मिलिमीटर झाला असून, दिवसभरात सरासरी 41.7 मिलिमीटर झाला आहे. सर्वात जास्त नारी मंडळात 79 मिलिमीटर तर सर्वात कमी खांडवी मंडळात - 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जवळगाव मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने नागझरी नदी पात्रातील पाण्याचे प्रमाण वाढले आहे. वैराग, उपळे दुमाला, गौडगाव मंडळात दमदार पाऊस झाल्याने भोगावती, नागझरी, खडकी या नद्यांसह ओढे - नाल्यांतील पाणी वाढले आहे. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने रात्री काही काळ वीजपुरठाही खंडित झाला होता.
उत्तरा नक्षत्रातील झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सध्या शेतातील सोयाबीन, उडीद, मूग पिकाचा काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे जातो की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
बातमीदार : बलभीम लोखंडे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.