जानेवारीअखेरीस उजनीतून सुटणार पाणी

पावसाळ्यातील भरपूर पाऊस आणि अवकाळीमुळे जिल्ह्यातील बंधारे, तलाव भरल्याने शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून अजूनपर्यंत झालेली नाही.
Ujani Dam
Ujani DamEsakal

सोलापूर - पावसाळ्यातील भरपूर पाऊस आणि अवकाळीमुळे जिल्ह्यातील बंधारे, तलाव भरल्याने शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून अजूनपर्यंत झालेली नाही. त्यामुळे रब्बी पिकांसाठी यंदा जानेवारीअखेरीस पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. त्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निश्‍चित होईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

जिल्ह्याच्या हरितक्रांतीसाठी उजनी धरणाचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून सोलापूरचा नावलौकिक वाढला असून रब्बीचा जिल्हा आता खरीपाकडे वळला आहे. अधीक्षक अभियंता साळे यांनी पाण्याचे चोख नियोजन केल्याने शेतीपिकांना वेळच्या वेळी पाणी मिळू लागले आहे. जानेवारीत एकदा आणि उन्हाळ्यात दोनदा पाणी सोडल्याने उत्पन्नात वाढ होण्यासही मोठी मदत झाली आहे. उजनीचा डावा व उजवा कालवा आणि बोगद्यातून शेतीसाठी पाणी सोडले जाते. जिल्ह्यातील बहुतेक शेती ओलिताखाली येण्यात उजनी धरणाचे मोठे योगदान राहिले आहे. शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मागणी प्राप्त झाल्यानंतर उजनीतून पाणी सोडले जाते. यंदाचे पहिले आवर्तन जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात नव्हे तर जानेवारीअखेरीस सोडले जाणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी वापरलेल्या पाण्याचे पैसे वेळेत भरल्यास उजनी धरणासंदर्भातील प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षाही अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्‍त केली.

Ujani Dam
सोलापूरकरांचा प्रवास होणार वेगवान

शेतकऱ्यांकडून अजूनपर्यंत पाण्याची मागणी झालेली नाही. टाकळी बंधाऱ्यातही पुरेसे पाणी असल्याने शहरासाठी पाणी सोडण्याची महापालिकेकडूनही मागणी आलेली नाही. मागच्यावर्षी जानेवारीत पाणी सोडण्यात आले होते. आता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनीतील पाण्याचे पुढच्या वर्षीचे नियोजन ठरेल.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा, सोलापूर

टाकळी बंधाऱ्यात 15 फुट पाणी

शहरातील नागरिकांच्या पिण्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाते. शेतीसाठी नदीतून पाणी सोडण्याचे उजनीच्या पाणी वाटपात तरतूद नाही. सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या हिप्परगा तलावात आणि टाकळी बंधाऱ्यात सध्या पुरेशा प्रमाणात पाणी आहे. टाकळी बंधाऱ्यात सध्या 15 फुटापर्यंत पाणी असल्याने महापालिकेकडून पाणी सोडण्यासंदर्भात अद्याप कोणतीही मागणी जलसंपदा विभागाकडे करण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com