सोयाबीन खरेदीत व्यापाऱ्यांना अच्छे तर शेतकऱ्यांना बुरेदिन 

karhad
karhad

कऱ्हाड - कमी कालावधीत चांगले पैसै मिळवुन देणाऱ्या सोयाबीन पिकाची काढणी संपत आली तरीही शासनाने किमान आधारभुत किंमतीने सोयाबीन खरेदी केंद्रे सुरु करण्यात आलेली नाहीत. शासनाची सोयाबीनची किमान आधारभुत किंमत ३ हजार ३९९ असली तरी सध्या सोयाबीन ३ हजार १०० ते ३ हजार २०० रुपयांनी खरेदी केले जात आहे. खरेदी केंद्रे सुरु नसल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे सोयाबीन घालण्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे अच्छे दिन सुरु असून शेतकऱ्यांना मात्र कमी मिळणाऱ्या दरामुळे बुऱ्या दिनाचा सामना करावा लागत आहे. 

खरीप हंगामात पावसावर कमी कालावधीत सहज येणारे आणि हमखास उत्पन्न मिळवुन देणारे पिक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. त्यामुळे खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन पिकाचे पेरणी होती. यंदा पाऊसमानही चांगला झाला असला तरी शेंगा भरायच्या वेळी पावसाने दांडी मारल्याने अपेक्षीत उत्पादन मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. शेतकऱ्यांना त्यांनी पिकाच्या उत्पादनासाठी घातलेला खर्च तरी निघावा या हेतुने केंद्र सरकारने किमान हमीभाव जाहीर करण्याचे धोरण घेतले. त्यानुसार केंद्र सरकारकडून दरवर्षी पिक उत्पादनासाठी दरवर्षी होणारा खर्च व अन्य बाबी विचारात घेवुन पिकांचे हमीभाव जाहीर केले जातात. यंदा सोयाबीनचा हमीभाव ३ हजार ३९९ रुपये असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यानुसार किमान हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करु नये असा कायदाच सरकारने केला आहे. मात्र हमीभावाची माहिती होईपर्यंत शेतकऱ्यांची सोयाबीन काढून बाजारपेठेत विक्रीसाठी आणले आहे. शेतकऱ्यांकडे काढलेले सोयाबीन ठेवण्याची व्यवस्था नसल्याने त्यांनी ते काढले की लगेच विक्रीसाठी बाजारपेठेत आणले. त्यांनी मिळेल त्या दराने त्याची विक्री करुन मिळेल तेवढे पैसे घेतले. काही व्यापाऱ्यांनीही किमान आधारभुत किंमतीचा विचारच न करता वाट्टेल त्या दराने सोयाबीनची खरेदी सध्या सुरु आहे. हमीभाव ३३९९ असताना बाजारपेठेते सध्या उतारा बघुन सोयाबीनला ३१०० ते ३२०० रुपये भाव मिळत आहे. त्यातच पणन विभागाकडून सोयाबीनची खरेदी केंद्रेही सुरु करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही व्यापाऱ्यांकडेच सोयाबीन घालण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांचे मोठी आर्थिक कोंडी होत आहे. क्विंटलला २०० रुपयांचा फरक पडत असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले सोयाबीन काही व्यापाऱ्यांकडून मनमानी दराने खरेदी करण्यात येत आहे. मात्र हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असतानाही त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र मुग गिळुन गप्पच असल्याचे दिसत आहे. 

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना 
शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पिक घेण्यासाठी कर्ज काढून, उसनेपासने पैसे घेवुन, काही शेतकऱ्यांनी तर व्याजाने पैसे घेवुन सोयाबीनची पेरणी केली. घाम गाळुन पिकवलेले सोयाबीन मात्र पणनची खरेदी केंद्रे सुरु नसल्याने कमी दराने विक्री करावे लागत आहे. त्यातुन काही व्यापाऱ्यांची चांदी होवुन त्यांना अच्छे दिन आले मात्र शेतकऱ्यांना क्विंटलला २०० रुपयांचा तोटा सोसावा लागत असल्याने त्याच्यासाठी बुरेदिनच पुन्हा आले आहेत. सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघाला नसल्याचे काही शेतकऱऱ्यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com