#Specialtyofvillage फळविक्रीतून फुलले तळेवाडीच्या दुष्काळग्रस्तांचे संसार

#Specialtyofvillage  फळविक्रीतून फुलले तळेवाडीच्या दुष्काळग्रस्तांचे संसार

फळेविक्रीचा छोटाच व्यवसाय, पण त्याद्वारे तळेवाडीतील साडेतीनशे कुटुंबांचे संसार फुलले आहेत. गेली चाळीस वर्षे या गावातील लोक या व्यवसायात आहेत. त्यामुळेच फळविक्रेत्यांचे गाव अशीच तळेवाडी (ता. आटपाडी) ची ओळख आहे. आज काहीजण मोठे व्यापारी, आडतदारही झाले आहेत. फळविक्री व्यवसाय दुष्काळी गावाला वरदानच ठरला आहे.

करगणीपासून पाच किलोमीटरवर माळावर वसलेले हे कायम दुष्काळी गाव. सुमारे तीन हजार लोकवस्ती असलेले. गावात बहुसंख्य धनगर समाज. मूळचा मेंढपाळी व्यवसाय होता; पण दुष्काळामुळे तो सांभाळणे जिकिरीचे होत होते. त्यामुळे ऊसतोडणीवर जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली. जगण्यासाठी काहीतरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. एकेकाळी गावातील बहुसंख्य कुटुंब ऊसतोडणीवरच जगत होती. वसंतदादा साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी अनेक कुटुंब सांगलीला जात. ऊसतोडणी संपल्यावर गावाकडे येऊन करायचे काय? त्यामुळे काहीनी सांगलीतच फळविक्रीचा छोटा व्यवसाय सुरू केला. काही वर्षांत ही संख्या वाढत गेली. आज ती साडेतीनशेवर 
गेली आहे.

आजघडीला फळविक्रीतून महिन्याला सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत या विक्रेत्यांना मिळकत होते. त्यामुळे फळविक्रीतूनच अनेकांचे संसार फुलत गेले आणि महत्त्वाचे म्हणजे हातचा कोयता सुटला. नवीन येणारी तरुणही याच व्यवसायत आली. हाताला काम नसल्यावर गावातील पोरांना फळविक्रीच समोर दिसते. आज गावातील साडेतीनशे कुटुंब हा व्यवसाय सांभाळतात. या गावातील ग्रामस्थ फळविक्रेते म्हणून सांगली, कोकण, पुणे अगदी मुंबईपर्यंत स्थिरावले आहेत. यातील  बहुसंख्य मंडळी सांगलीत स्थायिक झाली आहेत.

तेथेच जागा, घरे घेऊन रहात आहेत. तेथूनच मुंबई, कोकणात व्यवसाय करतात. सांगलीत कापडपेठ, कॉलेज कॉनर्र, मिरज रोड, माधवनगर आणि कऱ्हाड नाका, संजयनगर येथे रस्त्याच्या कडेला फळे विकणारे हमखास  तळेवाडीचे असतात. मुंबईत कळंबोली, पनवेल येथेही हीच मंडळी फळांची विक्री करतात. तळेवाडीचे लोण शेजारील करगणी आणि कोळा गावातही पसरले आहे.

चाळीस वर्षांपूर्वी गावातील शिवाजी सरगर यांनी ४० वर्षांपूर्वी पहिल्यांदा ऊस तोडणी करता करता ही वाट धरली. त्याच्या जोडीला रघुनाथ सरगरही आले. फळ विक्रीतून या दोघांनी सांगलीच्या बाजार समितीत अडत दुकान सुरू करण्यापर्यंत मजल मारली. या दोघांना  यावरच न थांबता गावातील तरुणांना, गरजूंना  फळविक्रीचा मार्ग दाखविला. त्यामुळे आज दुष्काळी तळेवाडी चार घास सुखाचे खात आहे.

आजची तरुण पिढी स्वतःची चारचाकी पिकअप गाडी घेऊन व्यवसाय करीत आहेत. सांगली येथील बाजार समितीतून फळांची खरेदी करून विक्रीसाठी कोकणात जातात. तेथे गावोगावचे आठवडा बाजार करतात. माल संपल्यावर पुन्हा सांगलीत येतात. काहीजण एकत्रित व्यसाय करीत आहेत. फळविक्री व्यवसायातील बारकावे आणि कला त्यांनी आत्मसात केले आहेत. हाच व्यवसाय त्यांना आवडतो आहे

दुष्काळामुळे जगण्याचे साधन म्हणून गावातील लोकांनी हा व्यवसाय निवडला. यातून कुटुंबाला लागेल तेवढे चांगले पैसे मिळतात. त्यामुळे हाताला काम नसणारी पोरही यात उतरत गेली.
- नामदेव सरगर, 

डाळिंब व्यापारी, तळेवाडी

फळविक्रेते झाले उत्पादक
भयानक दुष्काळामुळे जगण्यासाठी फळविक्री सुरू केली; मात्र अलीकडे टेंभू योजनेचे पाणी परिसरात आले आहे. याचा लाभ होणाऱ्या भागातील गावातील फळविक्रेत्यांनी डाळिंबाची मोठी लागवड केली आहे. यातून ते फळ उत्पादक झाले आहेत. शेतीतून चांगले डाळिंबाचे  उत्पादन घेऊ लागले आहेत.

फळविक्रेते झाले अडतदार आणि व्यापारी
तळेवाडी आणि फळविक्री याचे एक नातेच जुळले आहे. फळविक्रीतून काही तरुणांनी आटपाडी, सांगली आणि मुंबईत बाजार समितीत अडतदारी सुरू केली आहे. काहीजण नामवंत व्यापारी झाले आहेत. ते आटपाडीचे डाळिंब बाहेर पाठवत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com