#Specialtyofvillage महाकाय वटवृक्षाची ‘शिरसंगी’

#Specialtyofvillage महाकाय वटवृक्षाची ‘शिरसंगी’

‘जोगवा’ चित्रपटाच्या पाट्या पडू लागल्यावर कॅमेरा एका झाडाच्या फांद्यावरून फिरू लागतो. तो या चित्रपटातील मानवी नात्यांची, समाजजीवनाची व समाज व्यवस्थेची गुंतागुंत मांडत जातो. या चित्रपटातील कथानकाचा भाग बनून राहिलेला हा वृक्ष म्हणजे शिरसंगीचा महाकाय वटवृक्ष. सुमारे दीड एकर गायरानातील माळरान क्षेत्रात पसरलेला वटवृक्ष पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्याची विशालता पाहून आपण त्याच्या प्रेमात पडतो.

आजऱ्यापासून दहा किलोमीटरवर नेसरी रस्त्यावर शिरसंगी हे छोटे गाव. गावची लोकसंख्या अवघी १६९०, तर उंबरठा ४६० आहे. ते आता महाकाय वटवृक्षामुळे राज्यभर ओळखले जात आहे. तो वटवृक्ष सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षे जुना असावा, असे वनस्पती अभ्यासकांचे मत आहे. ग्रामस्थांच्या अनेक पिढ्या त्याच्या सावलीत वाढल्या व पोसल्या आहेत. त्यांचे बालपण या वटवृक्षाखाली गेले आहे. सूर-पारंब्याचे खेळ खेळणे, झाडाखाली झोके घेणे, गोठणावर जनावरे राखणीसाठी घेऊन जाणे असे जुन्या-नव्या पिढ्यांचे बालपण या झाडाच्या सावलीत गेले व समृद्ध झाले.

गाव तेथे देवराई ही संकल्पना पश्‍चिम घाटाच्या जंगल परिसरात आहे. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेले जंगल. पंचमहाभुतांशी (निसर्ग किंवा देव) ही संकल्पना जोडली गेली आहे. ती स्थानिकांनी जपली आहे. भविष्यकाळात अशा देवराई नव्याने विकसित होणे गरजेचे आहे.
- अनिल चौगुले,
कार्यवाह, निसर्गमित्र.

झाडाचा घेर मोठा असून, त्याच्या फांद्या, पारंब्या दीड एकर क्षेत्रावर विस्तारल्या आहेत. ‘जोगवा’ चित्रपटात हा वटवृक्ष दाखवला गेल्यानंतर अनेकांना त्याच्या विशालतेचे महत्त्व पटले. त्या वेळेपासून हा वटवृक्ष पर्यटकांना आकर्षित करत आहे. आज राज्यभरातून पर्यटक या वटवृक्षाला भेट देतात व देवराईचे महत्त्व समजून घेतात. या ठिकाणी शाळा, कॉलेजच्या सहली येत असतात. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून गतवर्षी सुरू झालेल्या ‘आडवाटेवरचे कोल्हापूर’ या सहलीच्या उपक्रमात या वटवृक्षाचा समावेश होता. पर्यावरणप्रेमी व वनस्पती संशोधक या ठिकाणाला भेट देत असतात. तत्कालीन विधानसभा सभापती बाबासाहेब कुपेकर यांनी येथे ‘क’ वर्ग पर्यटन केंद्र करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी काही विकासकामे केली आहेत. 

गेली अनेक वर्षे वटवृक्ष पाहत आहे. माझे पणजोबादेखील या वटवृक्षाबाबत सांगत असत. येथे गोठणदेव हे जागृत देवस्थान आहे. त्याची यात्रा मृग नक्षत्रामध्ये होते. मध्यरात्री बाराला सुरू झालेली यात्रा पहाटे चारपर्यंत चालते.
- गणपतराव गोविंद देसाई,
शिरसंगी.

आजरा तालुक्‍यात १९ देवराई आहेत. पैकी ही सर्वांत मोठी आहे. ग्रामस्थांची या देवराईशी श्रद्धा जोडली गेली आहे. त्यांचे भावनिक नाते गुंफले आहे. येथे ‘गोठणदेव’ हे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे येथे विविध धार्मिक कार्यक्रम होतात; पण या वटवृक्षाला धक्का पोचू नये, याबाबत ग्रामस्थ दक्ष आहेत. वयस्कर माणसं अनेक पिढ्यांपासून हा वटवृक्ष असल्याचे सांगतात. तालुक्‍यात चित्रीत होणाऱ्या मराठी चित्रपटांचे बहुतांशदा या परिसरात चित्रीकरण होत आहे. त्यामुळे गावच्या समाजजीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिलेला हा वटवृक्ष चित्रपटातही स्थान मिळवत आहे. पर्यावरण, निसर्ग संरक्षणासाठी ग्रामस्थांनी त्याच्या संवर्धनाची घेतलेली भूमिका आदर्शवत आहे. 

असा आहे वटवृक्ष

  •  दोनशे वर्षांपूर्वीचा वटवृक्ष
  •  त्याचा घेर साधारणः दहा हात आहे. 
  •  मुळं आणि फांद्या सुमारे दीड एकरांमध्ये पसरल्या आहेत.
  •  अनेक पक्ष्यांचा, कीटकांचा अधिवास
  •  प्रत्येक ऋतूत हा वटवृक्ष अनोखा दिसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com