चिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन

चिंता नको, तुमच्या शंकांचे होईल निरसन

सातारा - दहावीचा अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे, त्याचे आकलन, उपयोजन करत पुढे जाणे हे विद्यार्थ्यांसाठी जितके महत्त्वाचे आहे, तितकेच सुजाण पालकांसाठीही. हे करताना तुमच्या मनात शंकांचे काहूर माजले असेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. दहावीचा अभ्यासक्रम तयार करणारे तज्ज्ञ लोक थेट तुमच्याशी संवाद साधणारी कार्यशाळा वाईत शनिवारी (ता.१८) होणार आहे. 

‘सकाळ’च्या पुढाकाराने माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण, व्यावसायिक विकास संस्थेमार्फत नुकत्याच सातारा शहरात झालेल्या कार्यशाळेनंतर आता वाईत शनिवारी सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत किसन वीर चौकानजीकच्या साठे मंगल कार्यालयात ही कार्यशाळा होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य अभ्यास संशोधन मंडळातील कार्यरत तज्ज्ञ प्रत्यक्षात दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालक व दहावीच्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. पाठ्यपुस्तकातील विविध संकल्पना, त्यांची उद्दिष्टे, परीक्षा पद्धती, मूल्यमापन याबाबतची सविस्तर माहिती देतील. तसेच सर्व शंकांचे निरसन करतील. त्याची विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासात निश्‍चित मदत होईल. या कार्यशाळेचे उद्‌घाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते व ‘डीआयईसीपीडी’ फलटणचे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून बदलला आहे. त्यामुळे गुणांचा फुगवटा कमी होणार आहे. तसेच अभ्यासक्रम बदलल्याने, परीक्षा पद्धतीतही आमूलाग्र बदल झाले आहेत. या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार, याची सर्वाधिक भीती त्यांच्या पालकांना आहे. ही सर्व भीती काढून टाकण्यासाठी, बदललेल्या अभ्यासक्रमातही पाल्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सुजाण पालकांना मार्गदर्शनाची नितांत आवश्‍यकता आहे. ती पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने जुलैपासून ‘दहावी अभ्यासमाला’ हे सदर सुरू केले आहे. त्यातून राज्यस्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत. शिवाय, तितक्‍याच तोडीचे मार्गदर्शन जिल्ह्यातील दहावीच्या पालकांना मिळावे, यासाठी ‘सकाळ’ने माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण, व्यावसायिक विकास संस्थेमार्फत पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

नक्‍की या... बदल घडवा! 
वाईतील कार्यशाळा वाई, महाबळेश्‍वर आणि जावळी तालुक्‍यांतील दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी व दहावीच्या शिक्षकांसाठी मोफत असेल. त्यासाठी पालकांनी ८३०८५०२३०० आणि ९८५०५१०३०० या मोबाईल क्रमांकावर पाल्याचे नाव, शाळेचे नाव व तालुका या बाबी टाइप करून टेक्‍स्ट अथवा व्हॉट्‌सॲपवर मेसेज करावा. प्रथम नोंदणीला प्राधान्य राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com