विद्यापीठ बदलल्याने विद्यार्थी अडचणीत

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

सातारा - अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यापीठ बदलल्याने सध्या द्वितीय वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम महाविद्यालयातून शिकविला जात नसल्याने राज्यातील हजारो विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. विशेषतः 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने (बाटू) यावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांची आहे. 

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सक्षम तंत्रज्ञ बनविण्याच्या ध्येयाने राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (बाटू) समाविष्ट झाली. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ‘बाटू’ अंतर्गत समाविष्ट झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची सध्याच्या शैक्षणिक वर्षात सन २०१८-१९ मध्ये अडचण झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच्या विद्यापीठातून परीक्षा दिली आणि नापास झाले, अशांना ‘बाटू‘शी संलग्न असलेल्या महाविद्यालयातून शिक्षण घेता येत नाही. त्याचे प्रमुख कारण अभ्यासक्रमातील बदल हा आहे.

नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आमचे महाविद्यालय ‘बाटू’त गेल्याने सध्या महाविद्यालयात ‘बाटू’ चा अभ्यासक्रम शिकविला जातो. आम्हाला पूर्वीच्या विद्यापाठीचा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध आहेत. परंतु, महाविद्यालयांमध्ये तो अभ्यासक्रम शिकविला जात नाही. जिल्ह्यातील ‘बाटू’त समाविष्ट झालेल्या महाविद्यालयांनीही याबाबत दुजोरा दिला. ‘बाटू’मध्ये समाविष्ट झाल्याने आम्हाला त्यांचा अभ्यासक्रमच फॉलो करावा लागत आहे. जे विद्यार्थी द्वितीय वर्षांत अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांच्यासाठी पूर्वीच्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी वेगळे वर्ग भरवावे लागतील, वेगळे शिक्षक नेमावे लागतील. हे शक्‍य नसल्याचेही सांगितले जात आहे. संबंधित विद्यार्थ्यांना ‘बाटू’ने समाविष्ट करून घ्यावेत, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पत्रव्यवहारदेखील केला आहे, असेही सांगण्यात आले. दरम्यान, सद्य:स्थितीत पूर्वीच्या विद्यापीठातून परीक्षा द्यावयाची असलेल्या विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी लावणे अपरिहार्य झाले आहे.

‘बाटू’साठी आग्रह
‘बाटू’ऐवजी पूर्वीच्या विद्यापाठातून पुन्हा परीक्षा दिली आणि त्यामध्ये नापास झाल्यास पुन्हा सहा महिन्यांनतर परीक्षा द्यावी लागते. ‘बाटू’शी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मात्र सहा महिन्यांऐवजी एक महिन्याच्या अंतराने परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थीदेखील आम्हाला ‘बाटू’त घ्यावे, असा आग्रह धरताना दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com