एफआरपी एक रकमी देण्याचा कारखानदार - `स्वाभीमानी`च्या बेठकीत निर्णय

 एफआरपी एक रकमी देण्याचा कारखानदार - `स्वाभीमानी`च्या बेठकीत निर्णय

कोल्हापूर - शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेवून ऊस तोड चालू ठेवण्याचा निर्णय आज दुपारी साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. तोडणी सुरू झाल्या असल्या तरीही कोणत्याही कारखान्यांनी येथून पुढच्या काळात एफआरपीचे तुकडे करून रक्कम द्यायची नाही, असाही निर्णय या बैठकीत झाला.

कोल्हापुरात आज दुपारी एका संस्थेच्या कार्यालयात ही बैठक गोपणीयरित्या झाली. त्यामुळे गेल्या दोन दिवस बंद असलेली तोड आज सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. 

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील ऊस तोडी बंद आहेत. अनेक ठिकाणी स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. यामुळे कारखान्यांनी स्वत:हून तोडणी बंद केली. याचा विपरीत परिणाम ऊस गाळपावर होत असल्याने अखेर आज दुपारी जिल्ह्यातील कारखान्यांचे प्रतिनिधी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांत चर्चा झाली.

कारखानदारांनी सरकारच्या मदती शिवाय एफआरपीची रक्कम भविष्यात देणे अशक्‍य असल्याचे सांगितले. तर संघटनेचे कार्यकर्ते एक रकमीवर ठाम राहिले. पण सध्याची परिस्थिती पाहता यावर तातडीने तोडगा निघणे अशक्‍य असल्याचे मत कारखानदारांसह शेतकऱ्यांच्याच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. हंगाम थांबल्यास शेतकऱ्यांबरोबरच ऊस तोडणी कामगार व इतर घटकांचेही मोठे नुकसान होते. हा तोटा न भरून निघणारा असल्याने गाळप हंगाम सुरू ठेवण्याबाबत सर्वांनी चर्चेअंती एकमत नोंदविले. 

दरम्यान कारखान्यांनी येथून पुढे गाळप होणाऱ्या उसाची एफआरपीची रक्कम तुकड्याने न देता ती एक रकमीच द्यावी, असाही आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. अखेर तोडगा म्हणून कारखानदारांनी ही भूमिका मान्य केली. शासनाकडून अनुकुल निर्णय होईपर्यंत ऊस बिले प्रलंबित राहतील, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली. त्यालाही कार्यकर्त्यांनी मान्यता देवून तोडगा काढला. यामुळे गेली दोन दिवस बंद असलेले ऊसाचे गाळप आज पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.  
 

ऊस उत्पादकांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही एक पाऊल मागे घेतले आहे. मात्र याचा अर्थ हे आंदोलन थांबलेले नाहीत. एक रकमी एफआरपी मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. कोणत्याही कारखान्यांनी एफआरपीची रक्कम तुकड्याने जमा करू नये, असेही आवाहन आम्ही केले आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. 
-  भगवान काटे, 
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

साखरेचा विक्री दर 2900 रुपये असल्याने कारखान्यांकडून एफआरपी देणे अशक्‍य होत आहे. हा दर वाढवून घेण्यासाठी संघटनेने ही कारखान्यांना मदत करावी, प्रसंगी एकत्रित शासनाकडे पाठपुरावा करूया असाही निर्णय बैठकीत झाल्याचे सांगण्यात आले. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com