ऊसलागवड क्षेत्रात १४,६५० हेक्‍टरने घट

Sugarcane
Sugarcane

काशीळ - एकरकमी एफआरपी, पाणीटंचाई, अपुरा वीजपुरवठा आदी कारणांमुळे सातारा जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत आडसाली व पूर्व हंगामात सुमारे १४ हजार ६५० हेक्‍टरने घट झाली आहे. त्यामुळे पुढील गाळप हंगामात ऊस कमी पडणार असल्याने साखरेच्या उत्पादनात घट होणार आहे. 

जिल्ह्यात सुरू असलेल्या गाळप हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने हंगाम गतीने सुरू आहे. सर्वच कारखान्यांचे उद्दिष्टापेक्षा जास्त गाळप होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पुढील हंगामाचे चित्र बदलणार असून, आडसाली व पूर्व हंगामात होणाऱ्या लागवडीत घट झाली आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या वाढत असून, सध्या जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या १६ वर गेली आहे. मात्र, उसाच्या क्षेत्रात घट होत आहे. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात आडसाली हंगामात २३ हजार ९४ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. यावर्षीच्या हंगामात १८ हजार २३५ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. २०१७-१८ च्या तुलनेत यावर्षी सुमारे चार हजार ८५९ हेक्‍टरने लागवड क्षेत्र घटले आहे. तर पूर्व हंगामात गतवर्षी २२ हजार ५८३ क्षेत्रावर लागवड झाली होती. २०१७-१८ मध्ये १२ हजार ७९५ क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. पूर्व हंगामात नऊ हजार ७८८ हेक्‍टर घट झाली आहे.

आडसाली व पूर्व हंगामात मिळून १४ हजार ६५० हेक्‍टरने घट झाल्याने पुढील गाळप हंगामावर मोठा परिमाण होणार आहे. आडसाली ऊस हा शेतकऱ्यांनाही उत्पादन देणारा असतानाही शेतकऱ्यांकडून क्षेत्र कमी केले जात आहे. याचे कारण ऊस पावणेदोन ते दोन वर्षे शेतात राहतो.

यामुळे उत्पादन खर्चात होणाऱ्या वाढीबरोबर अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचा शेतकऱ्यांना अनुभव येताना दिसत आहे. अपुऱ्या पावसाने होत असलेली पाणीटंचाई आणि एकरकमी एफआरपी यांचा वाईट परिणाम लागवडीवर होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. उसाच्या क्षेत्र घटीचा परिणाम गाळप हंगामावर होणारा आहे. एकीकडे कारखान्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे क्षेत्राची होणारी घट यामुळे पुढील हंगामात उसाची पळवापळवी होणार आहे. तसेच साखर उत्पादनात घट होणार आहे.

सुरू व खोडवा उसावर हंगामाचे भविष्य 
जिल्ह्यात विविध कारणांमुळे ऊस क्षेत्रात होणारी घट ही साखर कारखान्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय होणार आहे. अजूनही सुरू हंगामाच्या उसाच्या लागवडी सुरू आहेत. तसेच खोडवा ऊस क्षेत्र किती शेतकरी ठेवणार, यावर पुढील गाळप हंगामाचे भविष्य ठरणार आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र कमी होणार असल्याने गाळप हंगाम यावर्षीच्या तुलनेत लवकर संपणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com