एफआरपीत मोडतोड केल्यास आंदोलन

एफआरपीत मोडतोड केल्यास आंदोलन

जयसिंगपूर - यावर्षीच्या गळीत हंगामात कारखान्यांना पाठवलेल्या उसाची पहिली उचल म्हणून एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा निघाला होता. त्यानुसार, जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पहिली उचल एकरकमी आणि विनाकपात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करावी. एफआरपीमध्ये तोडमोड केल्यास जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे व माजी जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक यांनी दिला. 

भगवान काटे म्हणाले, ‘‘ साखरेला उठाव नाही, तसेच दराचे कारण पुढे करून जिल्ह्यात बहुतांश साखर कारखान्यांनी पहिली उचल अद्यापही शेतकऱ्यांना दिलेली नाही. गळीत हंगाम सुरू होऊन ४० दिवस झाले. पहिली उचल १४ दिवसांत  देणे बंधनकारक असते, मात्र अद्यापही बहुतांश साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल एफआरपीप्रमाणे अादा केलेली नाही. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. एफआरपीमध्ये १ रुपयादेखील कमी घेणार नाही. जर यामध्ये मोडतोड करून बिले दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे.

सावकर मादनाईक म्हणाले, ‘‘ प्रत्येकवेळी शेतकऱ्यांच्यावर अन्याय कशासाठी केला जात आहे. उसाच्या दरात झालेली मोडतोड सहन करणार नाही, असा इशारादेखील यावेळी पदाधिकाऱ्यांनी बैठकीत दिला. 

यावेळी अण्णासो चौगुले, आदिनाथ हेमगिरे, रामचंद्र फुलारे, पै. विठ्ठल मोरे, राम शिंदे, सचिन शिंदे, पै. प्रकाश गावडे, सुरेश कांबळे, सागर संभूशेटे, मिलिंद साखरपे, सागर चिपरगे, शितल कंठी,संदीपकुमार बेडगे आदी उपस्थित होते. 

एफआरपी दोन टप्प्यांत देणार कारखानदारांची आज बैठक

कोल्हापूर - साखरेचे दर घसरत आहेत. त्यामुळे एकरकमी एफआरपी देणे मुश्‍कील झाले आहे. त्यामुळे एफआरपीची पहिली उचल २४०० रुपये व उर्वरित रक्कम ठराविक दिवसाने द्यावी, यासाठी शुक्रवारी दुपारी अडीचला येथील एका खासगी हॉटेलमध्ये साखर कारखानदारांची बैठक होणार आहे. यामध्ये, कारखान्यांचे प्रतिनिधी आपापल्या कारखान्याची भूमिका मांडणार असून अडचणीत आलेल्या साखर उद्योगासाठी केंद्र व राज्य शासनाने मदत करावी, अशीही मागणी केली जाणार आहे. 

यावर्षीचा गळीत हंगामाची सुरुवात कोणत्याही आंदोलनाशिवाय झाली. आंदोलन होण्याआधी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय झाला होता. हा निर्णय मान्य करून शेतकरी संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान, आता साखरेला दर नाही. साखरेची उचल होत नाही. साखरेचे किमान दर वाढवावेत, अशी मागणी केली होती. मात्र, ती पूर्ण केली नाही. आज एक महिना उलटला तरीही एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांनी सर्व कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर ही बैठक घेतली जात असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com