राधानगरीतील उत्खनन बंद करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

राधानगरीतील उत्खनन बंद करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

कोल्हापूर - राधानगरी अभयारण्यातील वन्यजीवांना धोका पोचविणारे आणि बेकायदेशीर उत्खनन तत्काळ बंद करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. महाराष्ट्र शासनाला वारंवार सूचना देऊनही यावर कारवाई केली नाही. याचा राज्याच्या मुख्य सचिवांनी शुक्रवारी (ता. २) खुलासा करावा, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे, अभयारण्याच्या दहा किलोमीटर परिसरातील सर्व उत्खननांवर कारवाई करावी लागणार आहे.  

राधानगरी अभयारण्य परिसरात मोठ्या प्रमाणात बॉक्‍साईटचे उत्खनन सुरू आहे. वन्यजीव व खणीकर्म विभागाने उत्खननास परवानगी दिली नाही, अशा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. त्या सुनावणीत न्यायालयाने वन्यजीवांना धोका असणारे उत्खनन होतेच कसे, असा सवालही राज्य शासनाला केला आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये राष्ट्रीय वन्यजीव विभागाने महाराष्ट्र शासनाला अवैध उत्खननावर कारवाईचे आदेश दिले होते; मात्र आजतागायत यावर कारवाई केली नाही.

न्यायालयाने अशा उत्खननावर कोणती कारवाई केली याबाबत जाब विचारला असता कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नसल्याने २ नोव्हेंबरला मुख्य सचिवांनी स्वत: हजर राहून याचा खुलासा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना अशा अवैध आणि अभयारण्यापासून १० किलोमीटरमध्ये असणाऱ्या उत्खननांवर कारवाई करावी लागणार आहे.  

जागतिक वारसा स्थळ
पश्‍चिम घाटामध्ये असणारे आणि महाराष्ट्रातील पहिले असणारे राधानगरी अभयारण्य आहे. ३५१.१४ चौरस किलोमीटर क्षेत्र
असणाऱ्या अभयारण्याची स्थापना १९५८ मध्ये झाली. याला दाजीपूर असे नाव दिले. कोल्हापूरच्या वैभवात भर टाकणाऱ्या याच अभयारण्यात ३५ प्रकारचे वन्यप्राणी, २३५ प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती आहेत. १८०० प्रकारच्या वनस्पतींपैकी १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आढळतात. ३०० औषधी वनस्पती आढळतात. या सर्व निसर्ग संपत्तीला धोका निर्माण करण्याचे काम बॉक्‍साईट उत्खननातून होत आहे. याचा विचार राज्य शासनाने गांभीर्याने घेतलेला नाही. अभयारण्यातील वृक्ष, प्राणी, पक्षी, औषधी वनस्पतींचा समावेशाचा विचार करून २०१२ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ यादीत या अभयारण्याचा समावेश केला आहे. 

अभयारण्यातील प्राणी
रानगव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दाजीपूरमध्ये दुर्मिळ होत चाललेला पट्टेरी वाघ, बिबट्या, लहान हरीण, गेळा (पिसोरी), सांबर, भेकर, डुक्कर, रानकुत्रा, अस्वल, शेकरु, रानमांजर, उदमांजर, ससा, लंगूर, याचबरोबर वटवघळाच्या तीन जाती आढळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com