पंचवीस वर्षांपूर्वी माझे वडील शंकरराव पाटील-कौलवकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपला वेगळा ठसा उमटवला होता. आजही अनेकांच्या तोंडून त्यांच्या कामाची पद्धत आणि घराघरापर्यंत केलेले विकासकाम ऐकायला मिळते. राधानगरी तालुक्यातील सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले आणि वकिलीची पदवी घेऊन राजकारणाला समाजकारणाची जोड दिलेले ते एकमेव लोकप्रिय नेते होते. तालुक्यातील अनेकांना शिक्षणाच्या प्रवाहात त्यांनी आणले. इतकेच नव्हे तर शेकडोंना शिक्षक म्हणून मानाचे स्थान मिळवून दिले. जिल्हा परिषदेमध्ये दीर्घकाळ अध्यक्षपदावर राहण्याचा त्यांचा विक्रम आजही कायम आहे. त्यांच्याच विचाराचा वसा आणि वारसा घेऊन मी या प्रवाहात उतरलो आहे.
राधानगरी तालुक्याचा भौगोलिक विचार करता येथे औद्योगिक विकास साधेल, असे म्हणणे धाडसाचे ठरणारे आहे. म्हणूनच त्याला पूरक विकासाचा विचार करून त्या दिशेने पाऊल टाकण्याची गरज आहे. आज येथे शेती, शिक्षणासह क्रीडा विभागाच्या संपूर्ण विकासाची गरज आहे. यासाठी माझे प्रयत्न असतील.
शंभर वर्षांपासून भोगावती काठावर आणि अलीकडे ३०-४० वर्षांपासून दूधगंगा आणि तुळशीच्या खोऱ्याने शेती सुजलाम् झाली आहे; परंतु पारंपरिक शेती पद्धतीमध्ये फारसा बदल झाल्याचे दिसत नाही. केवळ ऊस आणि भात या पलीकडेही फायद्याची पिके घेता येतात आणि त्याचे योग्य मार्केटिंग करता येते, याचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवून शेतीचा संपूर्ण विकास कसा साधेल, यावर भर असेल. त्याला दुय्यम म्हणून शेतीपूरक व्यवसाय उभारून सामान्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या घरात बरकत येण्यासाठीही विशेष लक्ष देणार.
शेतीमध्ये फूल, फळ आणि भाजीपाल्याची शेती कशी फायद्याची आहे हे समजून देत निशिगंधा, जरबेरा, गुलाब शेतीकडे लोकांना वळवू व तशी योग्य बाजारपेठही देऊ. हे सगळे साध्य करायचे असेल, आधुनिक तंत्रज्ञानातून शेती साधायची असेल तर युवा पिढी शिक्षित झाली पाहिजे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही इंजिनिअरिंग व मेडिकल कॉलेजची स्थापना करून गोरगरिबांना शिक्षणाची दालनं खुली कशी होतील, यावर भर देण्याचा मानस आहे. विविध व्यवसाय व प्रगत शेतीसाठी नाममात्र व्याजदरात कर्जे उपलब्ध करून द्यायची आहेत.
तालुक्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावरही न्यायचे आहे.
परिसरात कुस्ती, कबड्डीतून भरारी घेण्यायोग्य अनेक युवक आहेत; परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने घोडं अडलेलं आहे. त्याला दिशा मिळावी म्हणून क्रीडा विद्यापीठ निर्माण व्हावं हाही मानस आहे. माझे वडील शंकरराव पाटील- कौलवकर यांच्या राजकीय कारकिर्दीचा ठसा जसा माझ्या मनावर बिंबला आहे. तसाच माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या कार्याचा ठसा आहे. त्यांनाच राजकीय वडीलगुरू मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल सुरू आहे. त्यांनी माझ्यावर राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा समन्वयक म्हणून टाकलेली जबाबदारी मी समर्थपणे पार पाडत आहे. पुढे पक्ष वाढीसाठी प्रयत्न तर असतीलच शिवाय राधानगरीच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष लक्ष देऊन ते प्रत्यक्षात येण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहे.
आज मी कौलव या माझ्या गावातून ग्रामविकासाचा पाया रचला असून ही दिंडी पुढे तालुका आणि विधानसभा मतदारसंघात नेणार आहे. राधानगरी तालुका शिक्षण संस्थेची धुरा सांभाळत असताना अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्या विचारात घेऊन तालुक्यात शिक्षण गंगा कशी वाहेल हे पाहू. यामध्ये तालुक्यातील सामान्य जनता सोबत घेणार आहे. जसे माझ्या वडिलांवर लोकांनी प्रेम केले, माया केली, आपलंसं केलं तशीच माया माझ्यावर करतील, ही अपेक्षा ठेवून कार्यरत राहणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.