सरकारचे नवे धोरण ः संगणकीय प्रणालीद्वारे सेवाज्येष्ठतेनुसार बदल्या
कोल्हापूर - जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीद्वारे संवर्गनिहाय सेवाज्येष्ठतेनुसार राज्य स्तरावरून केल्या जाणार आहेत. ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे सुधारित धोरण बुधवारी जाहीर केले.
राज्यात हजारो शिक्षक अनेक वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. स्वतःचा जिल्हा सोडून शेकडो-हजारो किलोमीटर अंतरावर राज्याच्या एका टोकाला पती, तर दुसऱ्या टोकाला पत्नी सेवेत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत आतापर्यंत शासनाने ठोस धोरण ठरविले नव्हते. आता याबाबत नवे धोरण जाहीर केल्याने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षकांनी संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयात संगणकावर अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. बदलीसाठी केवळ एका जिल्हा परिषदेचीच निवड करावी लागेल. ज्या शिक्षकांना एका जिल्हा परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे, अशा शिक्षकांच्या बदली प्रक्रियेस प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर आजारी, अपंग, विधवा, कुमारिका आदी कर्मचाऱ्यांचा, 53 वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी, त्यानंतर पती-पत्नी एकत्रीकरण व शेवटी सर्वसाधारण संवर्ग असा प्राधान्यक्रम राहणार आहे.
यांची होईल बदली
बदलीस इच्छुक असलेल्या शिक्षकांची 31 मेअखेर किमान पाच वर्षे सलग सेवा आवश्यक.
विशेष संवर्गातील कर्मचाऱ्यांना सेवेची मर्यादा 3 वर्षांची आहे.
पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाल्यास स्वखुशीने पदावनत करण्याबाबतचे संमतीपत्र द्यावे लागणार.
आंतरजिल्हा बदलीसाठी आता जिल्हा परिषदेच्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता नाही.
पती-पत्नी जोडीदारापैकी एकानेच अर्ज करावयाचा आहे.
आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांनी संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयात नमुना अर्ज व संबंधित कागदपत्रांसह संगणकावर मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे.
- सुभाष चौगले, शिक्षणाधिकारी, कोल्हापूर.
|