सोलापूर - शिक्षक होण्याचे 2013 पासून पाहिलेले स्वप्न आता आठ वर्षांनंतर पूर्ण होत आहे. मात्र, ते पूर्ण होण्यासाठी अडथळ्यांची शर्यत सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना काही संस्था अथवा शाळांचा पसंतीक्रम निवडायचा आहे. पसंतीक्रम निवडला तरी तो अपलोड करण्याचा पर्याय पोर्टलवर उपलब्ध नाही. त्यामुळे अर्ज सादर करण्याकरिता 31 मेपर्यंत मुदत असतानाही ते प्रलंबितच राहिले आहेत.
या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी पोर्टववरील अडथळे दोन-तीन दिवसांत दूर करण्यात येतील. उमेदवारांना तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल, असे सांगितले. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी सध्या 12 हजार 1 जागांची शिक्षक भरती सुरू आहे. या भरतीमुळे भावी गुरुजींची आठ वर्षांची प्रतीक्षा संपल्याचे वाटत असतानाच पुन्हा पवित्र पोर्टलच्या सर्व्हर डाऊनची समस्या भेडसावत आहे. गुरुजी होण्यासाठी राज्यातील दीड लाख उमेदवारांनी अभियोग्यता व बुद्धिमत्ता आणि शिक्षक पात्रता परीक्षांची शर्यत जिंकली. मात्र, तरीही त्यांच्या स्वप्नातील अडथळ्यांची शर्यत संपलेली नाही.
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर उमेदवारांना शिक्षण संस्थांचा अथवा शाळांचा पसंतीक्रम नोंदवायचा आहे. मात्र, पसंतीक्रम भरल्यानंतर अर्ज "सबमिट' होण्यासाठीचा "लॉक' पर्याय नसल्याने येणारे अडथळे दोन-तीन दिवसांत दूर करण्यात येतील. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त
विधानसभेपूर्वी दुसरा टप्पा
पहिल्या टप्प्यात राज्यातील जिल्हा परिषद शाळा, खासगी अनुदानित संस्थांमधील 12 हजार एक रिक्त जागांसाठी भरती सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने तयारी केली आहे. त्यामध्ये आठ हजार जागा भरल्या जाणार आहेत. सप्टेंबर महिन्यात पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होईल, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
|