नगर/मुंबई - शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आसूड यात्रेच्या माध्यमातून सरकारला जाब विचारणारे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात "मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरची तुलना कबुतराशी केली होती; मात्र याबाबत टीका झाल्यानंतर "सचिनचा अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता', असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिले.
आसूड यात्रेदरम्यान भाषणावेळी शेतकरी आत्महत्याप्रकरणी आपले दुःख मांडताना बच्चू कडू यांनी सचिनची तुलना कबुतराशी केली होती.
'सचिनने काढलेले रन मोजणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहेत; मात्र या बांधापासून त्या बांधापर्यंत आयुष्यभर पायपीट करणाऱ्या शेतकऱ्याचे रन मोजायला कोणीही नाही, याचे दुःख वाटते. सचिनचे रन मोजू नका; ते कबुतर मेलं काय अन् राहिलं काय!'' असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते. सचिनने जनू पाकिस्तानच जिंकून आणला आहे, अशा पद्धतीने त्याला डोक्यावर घेतले जाते, असेही ते म्हणाले होते.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याच्या अनुषंगाने मी ते विधान केले होते. त्यात सचिनचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असा खुलासा बच्चू कडू यांनी केला.
|