सांगली जिल्ह्यातील बसाप्पावाडीत तरुणाच्या संशयास्‍पद मृत्यूने तणाव

सांगली जिल्ह्यातील बसाप्पावाडीत तरुणाच्या संशयास्‍पद मृत्यूने तणाव

ढालगाव - बसाप्पाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील शेतमजूर श्रीकांत कुंडलिक माळी (वय २५) या तरुणाचा मृतदेह आज संशयास्पद स्थितीत आढळून आला. गावकरी व त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करत पोलिसांना धारेवर धरले. त्यामुळे पोलिसांनी श्रीकांतचा मृतदेह मिरजेच्या सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर श्रीकांतच्या मृत्यूचे गूढ उकलेल. कवठे महांकाळ पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यू अशी नोंद झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुभाष कांबळे तपास करत आहेत. 

पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वीज पंप चोरीची तक्रार एकाने पोलिसांत केली होती. त्यानुसार कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांनी शनिवारी सकाळी श्रीकांतला चौकशीसाठी खासगी वाहनातून पोलिस ठाण्यात नेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याच्या घरातील वीज पंप जप्त केला. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित व्यक्‍तींनी ‘श्रीकांतकडे मिळालेला वीज पंप चोरीचा नसून त्याने खरेदी केलेला आहे, सोमवारी चौकशी व खातरजमा करूया,’ असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला पावती आणण्यासाठी सोडले.

दरम्यान, आज रविवारी सकाळी आगळगावच्या एका व्यक्तीला इरळी आणि अलकुड (एस)च्या सीमेवर एक मृतदेह दिसला. त्यांनी ही माहिती बसप्पाचीवाडी ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे मोटारसायकलजवळ (एमएच १० सीई २३५३) जवळ श्रीकांतचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या अवस्थेवरून मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी मृतदेह बाजूला केला. त्यावेळी त्याच्या अंगावर जखमा दिसल्या. 

जखमा पाहून पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड व पोलिस अधिकाऱ्यांसमोर गावकऱ्यांनी ‘मारहाणीमुळे श्रीकांत मरण पावला,’ असा आरोप केला. ‘मारहाणीची चौकशी व्हावी. दोषींवर कारवाई व्हावी. पोलिसांना त्यांना पाठीशी घालू नये. त्याशिवाय मृतदेह हलवणार नाही,’ असा पवित्रा घेतला. श्रीकांतच्या पाठीमागे आई, भाऊ, भावजय असे कुटुंब आहे. श्रीकांतला राहायला घर नाही. नुकतेत सरकारी योजनेतून घरकुल मिळाले आहे. तो चोरी करणार नाही. पोलिसांनी त्याला नेलेच कसे? असा सवालही उपस्थित केला. 

त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेच्या सरकारी रुग्णालयात हलवला. पोलिस उपाधीक्षक अशोक बनकर यांनी ‘शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल,’ असे सांगितले. 

आत्महत्याच...
श्रीकांतकडे विहिरीवरील दोन वीज पंप आहेत. त्यातील एकाची पावती त्याच्याकडे नव्हती. सरपंच बाळासाहेब जानकर त्यावेळी पोलिस ठाण्यात आले. हा प्रश्‍न गावातील असून, चौकशी करून सोमवारी पोलिस ठाण्यात हजर होऊ, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी माळीला कोणत्याही प्रकारची मारहाण केली नाही. आज श्रीकांतच्‍या घरात विषाची बाटली सापडल्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येमागे अन्य काही कारण आहे का? याचा तपास सुरू आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.

उत्तरीय तपासणी आज
श्रीकांत माळीचा मृतदेह आज सायंकाळी उत्तरीय तपासणीसाठी मिरज सरकारी रुग्णालयात आणण्यात आला. या वेळी शेकडो ग्रामस्थही खासगी वाहनांतून आले. त्यामुळे रुग्णालय परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उत्तरीय तपासणी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व दिवसा करावी लागणार आहे. त्यामुळे ती उद्या (ता. २२) सकाळी होईल, असे रुग्णालयातील सूत्रांनी सायंकाळी सांगितले.

कुटुंब गरीब आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही. 
- शंकर लंगोटे,
तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

पोलिसांच्या अन्यायाविरोधात आंदोलन करणार आहोत.
- नामदेव करगणे,
अध्यक्ष, 
बहुजन क्रांती मोर्चा संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com