संगमनेर : ""तालुक्याचा सहकार, शिक्षण, सांस्कृतिक वातावरणाचा राज्यात बोलबाला आहे; मात्र बाहेरच्या काही प्रवृत्तींना हे सहन होत नाही. जनतेच्या मनात विष कालविण्याचा प्रयत्न ते करतील; मात्र त्यांचा प्रयत्न हाणून पाडा. गटतट व मतभेद विसरून एकत्र या,'' असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
अंभोरे येथील साईमंदिर संरक्षक भिंत व राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासाहेब अंभोरकर होते.
थोरात म्हणाले, ""तालुका व गावाच्या विकासाची परंपरा आपण गेल्या 35 वर्षांच्या कालखंडातील कामातून जपली आहे. तालुक्याच्या विकासाला खीळ घालण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. आपल्या मनात विष कालविण्याचा प्रयत्न ते करतील; मात्र जनतेने आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी कटिबद्ध राहावे. बाहेरील उपद्रवी शक्तींचा मुकाबला करण्यासाठी तालुक्यातील जनता सज्ज आहे. पुढील काळातही अंभोरे गाव आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहील.''
""प्रामाणिक निष्ठेमुळे पक्षाने दिलेली राज्याची मोठी जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहे. तालुक्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. त्यांनी सजगतेने तालुक्यात काम करावे,'' असे आवाहनही थोरात यांनी केले.
रणजितसिंह देशमुख म्हणाले, ""सर्वत्र दुष्काळ व सहकार मोडकळीस आलेला असताना, संगमनेर तालुक्यात मात्र वेगळे चित्र आहे. भेदभावरहित राजकारण व विरोधकांचा सन्मान करणाऱ्या तालुक्यात समाजमन विषारी करण्याचा होणारा प्रयत्न हाणून पाडा. काही जण अंभोरे येथील विकासकामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.'' सरपंच भास्कर खेमनर यांनी प्रास्ताविक केले.
|