कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी अस्वलांचा वावर ठळक

कोल्हापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी अस्वलांचा वावर ठळक

कोल्हापूर - परंपरेनुसार बुद्ध पौर्णिमेच्या स्वच्छ चंद्रप्रकाशात जिल्ह्यातील वन विभागाच्या हद्दीत वन्यजीव गणना रात्रभर झाली. यात एका ठिकाणी वाघाचे, दोन ठिकाणी बिबट्याचे, तर दोन ठिकाणी अस्वल अशा वन्यजीवांचा वावर असल्याचे संकेत मिळाले. गव्यांचे कळप अनेक ठिकाणी दिसून आले. 

रात्रभर मचाणावर बसून वनपाल, वनमजूर, वनरक्षकांनी प्राणी गणतीत सहभाग घेतला. त्याच्या नोंदी घेतल्या. परंपरेनुसार बुद्ध पौर्णिमेला होणाऱ्या वन्यजीव गणनेचे महत्त्व पुन्हा एकदा ठळक झाले आहे. दरम्यान, या संकलित माहितीला वन विभागाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍यात विशेषतः जंगली, डोंगरी तालुक्‍यात सूक्ष्म पातळीवर प्राणिगणना करण्याचे नियोजन वन विभागाने केले. त्यानुसार शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्‍यांत काल सायंकाळी सातपासून वन्यजीव गणनेला सुरवात झाली. ती सकाळी आठच्या सुमारास संपली. बुद्ध पौर्णिमेला चंद्राचा प्रकाश ठळक असतो.

उन्हाळा असल्याने जंगलातील पाणवठे आटलेले असतात. पाण्याच्या शोधात वन्यजीव जंगलातून इकडे-तिकडे भटकतात. जंगली भागात काही पाणवठ्यांवर पाणी हमखास असते, तिथे प्राणी येतात. अशा पाणवठ्याच्या ठिकाणी मचाण बांधून वर्गीकरणानुसार गणना केली जाते. त्यानुसार चार ते सहा कर्मचाऱ्यांचे पथक मचाणावर थांबून होते. यात आजरा-भुदरगड सीमेवर बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या. चंदगड-तिलारी सीमेवर पट्टेरी वाघाचे ठसे आढळले. अर्थात हे ठसे पाणवठ्याची पाहणी करताना आढळले.

रात्री मात्र प्रत्यक्ष गणनेवेळी वाघ किंवा बिबट्या आढळला नाही. बाकी बहुतेक तालुक्‍यांत विशेषतः शाहूवाडी, चंदगड येथे गव्यांचे कळप रात्रभर फिरताना दिसत होते. चंदगडमध्ये मध्यरात्री, शाहूवाडीत पहाटे तर राधानगरीत अनेकदा गवे दिसले. चंदगडमध्ये सांबराचा वावर ठळकपणे जाणवला. जांबरेजवळ व भुदरगड तालुक्‍यात दोन ठिकाणी अस्वलाच्या वावराचे संकेत मिळाले आहेत. अन्य भागात मात्र वन्यजीवांचे ओझरते दर्शन झाले. 

यात शाहूवाडी तालुक्‍यात गव्यांची संख्या लक्षणीय होती. घनदाट जंगल असूनही काही लहान प्राण्यांचे दर्शन झाले. विशेषतः ससे, साळिंदर, खवले मांजर, अजगर यासारखे प्राणी कमी संख्येने दिसल्याचे सांगण्यात आले. काही ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यातही वन्यजीवांची छबी टिपली गेली आहे. वन्यजीवांचा वावर असलेली ठिकाणे गोपनीय ठेवली आहेत. या सर्व वन्यजीवांच्या हालचालींच्या नोंदी घेऊन ही पथके आज कार्यालयात आली. या माहितीचे पृथक्करण करण्यात येणार आहे, असेही वन विभागाकडून सांगण्यात आले.

पाणवठ्याचे महत्त्व अधोरेखित
उन्हाळ्यामुळे ओढे-नाल्यांचे पाणी आटून गेले आहे. अशात वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती वाढते. वन्यजीव पाण्याच्या शोधत नागरी वस्तीत येतात. हा धोका लक्षात घेऊन वन विभागाने काही नैसर्गिक पाणवठ्यांची डागडुजी करून पाणी साठवले. अशा पाणवठ्यांवर वन्यजीवांचा वावर ठळक दिसला. त्यामुळे उन्हाळ्यात पाणवठ्यांचे महत्त्व वन्यजीवांची साखळी सुरक्षित ठेवण्यासाठी असते, हे स्पष्ट झाले आहे. पाणवठे सक्षमीकरणावर भर द्यावा लागणार आहे, हेदेखील अधोरेखित झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com