राजे तुम्ही आम्हांला हवे आहात...

राजे तुम्ही आम्हांला हवे आहात...

सातारा : खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात जाणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यांना अडविण्यासाठी विविध नेत्यांकडून त्यांची मनधरणी होत आहे; पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आजही उदयनराजे हवे असून, त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणूक उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली लढण्यास सर्व जण तयार आहोत, अशी सादही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घातली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या मनधरणीचा उदयनराजेंच्या भूमिकेवर परिणाम होणार का, याची उत्सुकता आहे. 


विधानसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपमध्ये घेऊन त्यांच्या माध्यमातून आगामी निवडणूक लढण्याची तयारी भाजप करत आहे. उदयनराजे सोडून गेले, तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीतील नेत्यांसह पदाधिकारी अस्वस्थ आहेत. अशातच उदयनराजेंच्या प्रवेशाच्या चर्चांनी आणि त्यांच्या भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. उदयनराजेंनंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर हेही शिवसेनेत जाण्याची तयारी करत आहेत. या सर्व चर्चांनी राष्ट्रवादींतर्गत कलह पेटला आहे. या कलहातून पक्षाला वाचविण्याची जबाबदारी पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील आणि बाळासाहेब पाटील यांच्यावर आली आहे. आजपर्यंत बहुतांशी नेत्यांनी उदयनराजेंची भेट घेऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडू नये, अशी विनंती केली आहे. सत्ता आणि विकासाच्या मुद्‌द्‌यावर ते भाजपमध्ये जाण्यास तयार झाले आहेत; पण तेही द्विधा मनःस्थितीत आहेत. भाजपमध्ये जाऊनही खासदारच व्हायचे, एखादे चांगले "प्रपोजल' मिळाल्यास ते स्वीकारून मगच प्रवेश करण्याची तयारी आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या समर्थकांनीही "ग्रीन सिग्नल' दिला आहे; पण आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडूनही पक्ष न सोडण्याचा आग्रह होऊ लागला आहे. उदयनराजे राष्ट्रवादीला हवे आहेत, त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष लढण्यास तयार आहे, अशीही साद पक्षातील कार्यकर्ते घालू लागले आहेत. कार्यकर्त्यांची ही साद उदयनराजेंचे मत परिवर्तन करणार का, हा प्रश्‍न आहे, तरीही ते भाजपमध्ये गेले, तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. पक्षाला या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठी खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भूमिका घ्यावी लागणार आहे. 

मन वळविणे हाच पर्याय 

खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील आपसातील वादामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. उदयनराजे आणि रामराजेंतील वाद मिटविण्यात पक्ष नेतृत्वाला आलेल्या अपयशाचा हा परिपाक आहे. अजून वेळ गेलेली नाही. मन वळविणे हाच पर्याय उरला असल्याचे पक्षाच्या गोटातून सांगण्यात आले.

पक्ष अडचणीत असताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षत्याग करू नये, अशी माझ्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. 

- आमदार मकरंद पाटील. 
 

शरद पवार हे असे नेतृत्व आहे, त्यांच्यावर जनतेचे प्रचंड प्रेम व सहानुभूती आहे. वाढती बेरोजगारी, उद्योगधंद्यांची घसरण होत असून, शेतकऱ्यांचे प्रश्‍न आ वासून उभे आहेत. या परिस्थितीला तोंड देण्यास सध्याचे सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणीही पक्ष सोडू नये. साताऱ्यातील सर्वसामान्यांच्या लढ्यात सहभागी व्हावे. आम्ही तुमच्यासोबत आहे. संपूर्ण महाराष्ट्राची सहानुभूती असलेल्या शरद पवारांसारख्या नेतृत्वाच्या पाठीशी सर्वांनी एकजुटीने उभे राहावे. 

- आमदार शशिकांत शिंदे, पक्षप्रतोद .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com