सोलापूर - उजनी धरणातील पाणी नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शेतीसाठीदेखील अयोग्य असल्याचा निष्कर्ष सोलापूर विद्यापीठाच्या संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात निघाला आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे विद्यार्थी धरणाच्या काठावरील काही कुटुंबांचा सर्व्हे करणार आहेत. त्यामध्ये सोलापूरसह पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील काही गावे निवडली आहेत.
उजनी धरणात रसायनमिश्रित पाणी असून, ते दूषित पाणी पिल्याने नागरिकांमध्ये पोटाचे विकार वाढत असून, शेतीच्या उत्पन्नातही घट होत आहे. धरणातील पाण्याचा रंगही सध्या हिरवा झाला असून, ते पाणी भाजीपाल्यासह फळबागांसाठी घातक असल्याचे मत विद्यापीठाकडून नोंदविण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात सोलापूर विद्यापीठाने धरणातील नऊ ठिकाणचे पाण्याचे नमुने लॅबमध्ये तपासले होते. आता डिसेंबरअखेरीस त्याच ठिकाणच्या पाण्याचे नमुने पुन्हा तपासले जाणार असून, त्यानंतर उन्हाळ्यातही त्याची पडताळणी केली जाणार आहे.
तिन्ही हंगामात धरणातील पाण्यात कसा बदल होतो, त्याचे मानवी जीवनावर व शेतीवर काय परिणाम होतो, याविषयी विद्यापीठ संशोधन करीत आहे. त्यासाठी विद्यापीठाने 3 लाख 84 हजारांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती या संशोधनाचे प्रमुख प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी सांगितले.
संशोधनाचा दुसरा टप्पा
उजनी धरणामुळे बाधित झालेल्या 51 गावांपैकी सोलापूर व पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी दोन गावे आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव या संशोधनासाठी विद्यापीठाने निवडली आहेत. तसेच या गावांमधील 47 हजार कुटुंबापैकी 470 गावांचा सर्व्हेही डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात पुन्हा त्याच ठिकाणचा सर्व्हे करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.
|