सोलापूर - जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणीपातळी मागील चार-पाच दिवसांपूर्वी शंभरीच्या खाली आली. त्यातच जिल्ह्यात जेमतेम 40 टक्केच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे.
यंदाचा पावसाळा संपला आहे. परतीच्या पावसानेही राज्यातून काढता पाय घेतला असल्याने पावसाबाबतची शेतकऱ्यांची आशा संपुष्टात आली आहे. सध्या ऑक्टोबर महिना सुरू असल्याने पावसाची आशा संपुष्टात आली आहे. उजनी धरण यंदा 27 ऑगस्टला शंभर टक्के भरले होते.
त्यानंतर जवळपास दीड महिना कालवा व नदीच्या माध्यमातून धरणातून पाणी सोडले जात होते. त्यातच आता पुणे जिल्ह्यातून उजनीत येणारे पाणीही बंद झाल्याने धरणाची पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. उजनीच्या पाण्याचा जिल्ह्यातील काही तालुक्यांना निश्चितच फायदा होतो. मात्र, अनेक तालुके या पाण्यापासून वंचित राहतात. दुष्काळात त्याचा फटका या तालुक्यातील शेतकऱ्यांना बसतो.
पाण्याची पातळीही कमी झाली आहे. दुष्काळाच्या उपाययोजना सुरू करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्ह्यात चार महिन्यांच्या पावसाळ्यात जेमतेम 40 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. त्यात जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी या सगळ्यांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यांत भीषण पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने प्रशासनही कामाला लागले आहे.
धरणात 99.12 टक्के पाणीसाठा
उजनी धरणात आज सकाळी सहा वाजता 99.12 टक्के इतका पाणीसाठा होता. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 53.10 टीएमसी इतका आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 80 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
|