केत्तूर - उजनी धरण 100 टक्के भरले असले तरी, पावसाने सोलापूर जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. परतीचा पाऊस न झाल्यास सोलापूरसह नगर जिल्ह्याचीही भिस्त उजनी धरणातील पाण्यावर राहणार आहे. त्यामुळे धरणातील पाण्याच्या काटेकोर नियोजनाची गरज आहे.
शेती व्यवसाय व ग्रामीण भागाचा अर्थकणा मजबूत ठेवायचा असेल तर पाण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. "उजनी'च्या पाण्याची पळवा-पळवी लक्षात घेता 117 टीएमसी पाणीसाठाही कमी पडत आहे. ज्या-ज्या वेळी उजनी पूर्ण क्षमतेने भरून "ओव्हर फ्लो' होते, त्या वेळी धरणग्रस्त शेतकऱ्यांना विशेषतः करमाळा, इंदापूर, कर्जत, दौंड भागात फेब्रुवारीपासूनच हक्काच्या पाण्यासाठी आक्रोश करावा लागतो. "अप्पर भीमे'वर पुणेकर आणि उजनी धरणावर सोलापूरकर हक्क सांगतात; मग "उजनी'साठी त्याग केलेल्या, सर्वस्व गमावलेल्या धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी हक्काचे पाणी आहे तरी कोठे, असा सवाल विचारला जात आहे.
"उजनी'च्या पाण्यासाठी वाढता राजकीय हस्तक्षेप धरणग्रस्तांना त्रासदायक ठरत आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन धरणातील पाण्याचे मे 2019 अखेर नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
"उजनी'च्या मूळ धरणग्रस्तांवर अन्याय होऊ नये, याची दक्षता घेऊन पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.
- अजित विघ्ने, केत्तूर
|