कर्जत (नगर) : कर्जत-जामखेडचा निकाल लागलाय. आपलं ठरलंय. आता, फक्त रोहितला निवडून देऊन चालणार नाही. तर, पुढच्या पाच वर्षांत त्याला प्रत्येक कामात साथ दिली पाहिजे. आम्हाला बारामती बदलायला 50 वर्षे लागली. कर्जत-जामखेड बदलायला 5 ते 7 वर्षांपेक्षा जास्त काळ लागणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्या प्रचारासाठी आज, शरद पवार यांनी प्रचार सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. येत्या 24 तारखेला कर्जत-जामखेडमध्ये भाजपचा राम शिल्लक राहणार नाही, असा टोला पवार यांनी मंत्री राम शिंदे यांना लगावला.
पवार म्हणाले, 'मुख्यमंत्री एकदा नाही, तीन वेळा कर्जत-जामखेडला आले. ते कायम कुस्तीचा विषय काढतात. कसली कुस्ती खेळायची. कुस्ती खेळायची कुणासोबत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, तुम्ही कुस्तीचा विषय काढला, पण कुस्ती परिषदेचा मी अध्यक्ष आहे. ज्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. तेथे त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही.'
पवार म्हणाले, 'पत्रकार 24 तारखेला एक मथळा निश्चित लिहितील की, कर्ज-जामखेडमध्ये भाजपचा रामच शिल्लक नाही. ज्याच्यात राम नाही, त्यांची चर्चा करण्यात काय अर्थ आहे. कर्जतच्या तरुणांनी भाजपची झोप उडवली आहे, हे मात्र निश्चित.'
पवार म्हणाले, 'आमच्या काळात आम्ही पुणे, नाशिक, रांजणगाव, लातूर, नांदेडला कारखाने काढले. सध्या मंदी आहे. तरुणांना रोजगार नाही. ज्यांच्या हातात काम आहे. त्यांच्या नोकऱ्या जात आहेत. 52 वर्षांच्या पूर्वी रोहित एवढाच असताना मी, माझी पहिली निवडणूक लढवली. त्यावेळी बारामती आजच्या सारखी नव्हती. त्यानंतर बारामतीचा चेहरा बदला. अनेक ठिकाणची मुलं आज शिकायला येतात. कर्जत-जामखेडची ओळख दुष्काळी भाग होती. एकेकाळी नेहरू-इंदिरा गांधी दुष्काळ पहायला इकडे आले आहे. मला विश्वास आहे की तरुणांमुळे एखादा परिसर कसा बदलतो हे पाहण्यासाठी पंतप्रधानांना कर्जत-जामखेडला यावे लागेल.'
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.