नगर ः जिल्ह्यातील 51 ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची गैरवर्तन, अपहार आदी कारणांनी विभागीय चौकशी सुरू आहे. त्यातील काहींचे निलंबन झाले आहे. एकेका ग्रामसेवकावर किमान तीन ते चार गावांचा पदभार आहे. चौकशी लागलेल्या ग्रामपंचायतीचा पदभारही त्यांच्या अंगावर आला आहे. त्यातच 230 ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने गावगाडा अडला आहे.
जिल्ह्यात 1 हजार313 ग्रामपंचायती आहेत. त्यांचा कारभार पाहण्यासाठी शासनाने 952 ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची 253 पदे मंजूर केली आहेत. मंजूर पदांपेक्षा ग्रामसेवकांची 96, तर ग्रामविकास अधिकाऱ्यांची 26 पदे रिक्त आहेत. सध्या 856 ग्रामसेवक व 227 ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. कार्यरत असलेल्या 12 ग्रामविकास अधिकारी व 38 ग्रामसेवक, अशा एकूण 50 जणांची, तर एका सेवानिवृत्त विस्तार अधिकाऱ्याची सध्या विभागीय चौकशी सुरू आहे.
प्रशासकीय अनियमितता, गैरवर्तन, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, बैठकांना हजर न राहणे, अपहार आदी कारणांमुळे ही चौकशी सुरू आहे. एप्रिल 2019 नंतर सुमारे 59 जणांची चौकशी सुरू होती. त्यांतील आठ जणांची विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे. आठ जणांपैकी एकाला सेवानिवृत्ती घेण्याचा आदेश आहे. उर्वरितांपैकी सहा जणांची वेतनवाढ रोखली आहे.
चौकशीमध्ये तीन तालुके आघाडीवर
विभागीय आयुक्तांच्या चौकशीमध्ये पाथर्डी, पारनेर, संगमनेर तालुक्यांतील ग्रामसेवकांची संख्या जास्त आहे. त्याखालोखाल नेवासे, शेवगाव, अकोले, जामखेड या तालुक्यांचा क्रमांक लागतो.
कामे खोळांबली
ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने गावपातळीवरील सर्व कामे खोळांबली आहेत. अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम महसुल अधिकाऱ्यांबरोबरच ग्रासेवकांवरही सोपविले आहे. या कामातही अडचणी येत आहेत.
|