शिवाजी महाराजांच्या स्मारकाची कोणाशीच तुलनाच होऊ शकत नाही: मेटे

शिवाजी महाराजांच्या स्मारकाची कोणाशीच तुलनाच होऊ शकत नाही: मेटे

कोल्हापूर - राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. दुष्काळ आणि पुरासारख्या आपत्तीमुळे शेतकऱ्याला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या 25 पिकांना विमा कवच द्यावे आणि त्यासाठी लागणारी शंभर टक्‍के रक्‍कम ही शासनानेच द्यावी, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केली.

सर्किट हाउस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या 9 फेब्रुवारीला औरंगाबाद येथे मेळाव्यात पिक विमा, शेतकरी पेन्शन, बुलडाणा शहराच्या नावात बदल, नदी जोड प्रकल्प आदी मागण्या करणार असल्याचेही मेटे यांनी सांगितले. 

मेटे म्हणाले, अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या कामाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येवून काम सुरु करण्यात आले होते. परंतु महाराष्ट्रद्रोही महाराजांच्या विरोधातील लोकांनी सर्वोच्च न्यायालयात या कामाला आव्हान दिले आहे. सरकारी वकिलांनी याबाबतची बाजू मांडली आहे. याबाबतची कागदपत्रे सादर करण्याच्या सुचना न्यायालयाने केल्या आहे. त्यामुळे पुढील आठ ते पंधरा दिवसात ही माहिती सादर केली जाणार आहे. यासाठी विधीज्ञांची फौज लावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या स्मारकाची तुलना सरदार वल्लभाई पटेल यांच्या स्मारकाशी केली जात आहे. हे योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीच तुलना होवू शकत नाही. पटेल यांचे कामही मोठे आहे. पण या दोघांमध्ये तुलना करणे योग्य नसल्याचे मेटे यांनी सांगितले. 

पत्रकार परिषदेस बाबा महाडिक, माजी उपमहापौर महेश सावंत, संदिप कदम आणि मेडिकल असोशिएशनचे मदन पाटील उपस्थित होते. 

औरंगाबाद येथे मेळावा 
शिवसंग्रामच्यावतीने येत्या 9 फेब्रुवारीला औरंगाबाद येते मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार चंद्रकांत खैरे यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. या मेळाव्यात पाच लाख शेतकरी व शेतमजुरांकडून पेन्शन मिळण्यासाठी मागणी अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पेन्शन मिळवण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी असल्याचे मेटे यांनी सांगितले. 

बुलडाण्याचे नाव राजमाता जिजाऊ नगर करा 
राजमाता जिजाउंजा जन्म बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यामुळे या जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाउनगर ठेवावे, अशी मागणी शिवसंग्रामने केली आहे. येत्या 1 तारखेपासून बुलडाणा जिल्ह्यातील गावागावात यासाठी सह्यांची मोहिम राबवली जाणार आहे. या सह्यांचे निवेदनही राज्य शासनाला दिले जाणार आहे. कोणत्याही परिस्थिती हे नाव बदलणारच, असा विश्‍वास आमदार मेटे यांनी व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com