सोलापूर : यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत राज्यातील तब्बल 76 लाख 52 हजार 696 जणांवर दंडात्मक कारवाया केल्या आहेत. त्यांच्याकडून 130 कोटी 59 लाख 57 हजार 844 रुपयांचा दंड वसूल केला आहे. दुसरीकडे यंदा तब्बल 29 हजार 763 अपघात झाले असून त्यामध्ये 10 हजार 691 जणांचा मृत्यू झाल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.
अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहतूक सुरळीत व्हावी, वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस, आरटीओ आणि महामार्ग पोलिसांकडून नियंत्रण ठेवले जाते. दुसरीकडे मात्र, अपघातांबरोबरच राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) 49 ने वाढले असून सद्यस्थितीत 1324 ब्लॅक स्पॉट आहेत. बहुतांशी ठिकाणी काहीच उपाययोजना केल्याचे दिसून येत नाहीत. महामार्ग पोलिसांच्या माहितीनुसार त्या ठिकाणांवर सरासरी दरमहा एक हजार लोकांचा मृत्यू होतो तर दुसरीकडे तीन हजार जण जखमी होतात, असे स्पष्ट होते. मोबाईल टॉकिंग, विना परवाना, विना हेल्मेट वाहन चालविणे, मद्यधुंदीत वाहन चालविणे, अतिवेग, क्षमतेपक्षा अधिक माल अथवा प्रवाशी वाहतूक अशा प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचेही दिसून येते.
कारवाया करुनही वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून अपघाताच्या तुलनेत सोलापूर राज्यात अव्वल आहे. त्याचे प्रमाण कमी करणे आणि वाहनचालकांना स्वयंशिस्त लावण्याबरोबरच दंडात्मक कारवाया करणे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबीत करण्याची कारवाई कडक केली जात आहे.
- संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
आकडे बोलतात...
(2017)
एकूण अपघात
35,853
मृत्यू
12,264
जखमी
32,128
दंडात्मक कारवाया
93,25,499
दंड वसूल
174.51 कोटी
(2018)
एकूण अपघात
29,763
मृत्यू
10,691
जखमी
26,406
दंडात्मक कारवाया
76,52,696
दंड वसूल
130.60 कोटी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.