किल्लेमच्छिंद्रगड (सांगली) : साखर कारखान्यातील मळीमिश्रित पाण्याने शेतपिकाची वाढ जोर धरीत असल्याने वाळवा तालुक्याच्या उत्तर भागातील ताकारी, भवानीनगर, येडेमच्छिंद्र, नरसिंहपूर, किल्लेमच्छिंद्रगड, लवंडमाची, बेरडमाची या गावांतील शेतकरी शेणखतास पर्याय म्हणून मळीमिश्रित पाणी शेतीस खत म्हणून वापर करू लागले आहेत. या दूषित पाण्याने पिकांची झटपट वाढ होत असली तरी भूगर्भातील पाणी खराब होत आहे. विहिरी, कूपनलिकेत दूषित पाण्याचा पाझर होत असल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ लागली असल्याचे दिसून येत आहे.
साखर कारखान्यांनी मळीमिश्रित पाण्याची निर्जनस्थळी विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदाराकरवी उपाययोजना केलेली असते. तथापि ठेकेदार वाहतुकीत बचत करण्यासाठी तसेच टॅंकरमागे पाचशे रुपये अतिरिक्त मिळत असल्याने मळीमिश्रित पाण्याची परिसरातील शेतकऱ्यांना विक्री करतात. शेतकऱ्याकडून झटपट पीक, उत्पन्न वाढीस चालना देणारे मळीमिश्रित पाणी शेतात सोडून नांगरट, मेहनत केली जाते.
ऊसपिकासह इतर रब्बी, खरिपाची पिके घेतल्यानंतर शेतीस दिलेल्या सिंचनाच्या तसेच पावसाच्या पाण्याबरोबर हे दूषित पाणी जमिनीत जिरून भूगर्भातील पाणी प्रदूषित करते. त्याचा पाझर विहीर, बोअरिंगमध्ये होऊन मानवाबरोबर पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या कायमस्वरुपी तयार होऊ लागली आहे. परिसरातील मानवी, पशुधनाचे आरोग्य धोक्यात येण्याचे संकट तयार होत चालले आहे.
"झटपट पीक वाढीचा रिझल्ट मिळत असला तरी शेतीत मळीमिश्रित पाण्याचा वापर नको. भूगर्भातील पाणी प्रदूषित झाल्याने गावास पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. ठेकेदारांनी मळीमिश्रित पाणी विक्री करू नये यासाठी संबंधित साखर कारखान्यांनी कठोर उपाय योजावेत.
- जे. एस. नांगरे, ग्रामविकास अधिकारी, किल्लेमच्छिंद्रगड
हेही वाचा - सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे निधन
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.