राधानगरी धरणात १५ ते २० दिवस पुरेल इतका पाणीसाठा

राधानगरी धरणात १५ ते २० दिवस पुरेल इतका पाणीसाठा

कोल्हापूर - राधानगरी धरणात आणखी १५ ते २० दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत राधानगरी धरणात पाण्याचा पुरेसा साठा असून, पाणीकपातीची तूर्तास कोणतीही शक्‍यता नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. तारळे ते शिरोळपर्यंतच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात (केटीवेअर) पुरेसे पाणी असून, वेळ पडली तर दुसऱ्यांदा बंधारे भरण्याची तयारी असल्याचेही सांगण्यात आले.

जून महिना सुरू झाला तरी अद्याप पाऊस सुरू होईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर राधानगरी धरणातील साठा हा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. धरणात सध्या ०.७६ टीएमसी इतके पाणी आहे. तुळशी धरणात ०.८० टीएमसी, कुंभी कासारीत ०.७०, वारणेत २.५० टीएमसी इतका साठा आहे. पाऊस जरी लांबला तरी आणखी १५ ते २० दिवस पुरेल इतके पाणी आहे. २०१६ मध्ये पाणी कपातीचे मोठे संकट होते. पिण्याच्या पाण्याचा साठा संपून मृत साठ्यातील (डेड स्टोअरेज) पाण्याचा वापर करण्याची वेळ आली होती. तशी स्थिती यंदा नाही. जलसंपदा विभागाचे सिंचन तसेच बिगर सिंचन वापराचे वेळापत्रक निश्‍चित असते. १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाणी वापराचा साठा आणि त्याचा विसर्ग कोणत्या वेळी किती करायचा, हे ही ठरलेले असते.

२२ मे रोजी तारळ्यापासून ते शिरोळपर्यंतच्या बंधाऱ्यात पाणी सोडले गेले आहे. सध्या हे बंधारे ओव्हरफुल्ल आहेत. पाण्याची सद्यःस्थिती चांगली असली तरी पाऊस लांबलाच तर जलसंपदा विभागासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करावा लागेल.

नदीत पाणी उपशासाठी पुरेशी पातळी न मिळाल्यास शहर पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. शिंगणापूर बंधाऱ्याजवळ गेल्या अनेक वर्षापासून गळती आहे. सुमारे चारशे क्‍युसेक पाणी पुढील बंधाऱ्याच्या दिशेने जाते. गळतीमुळे येथे पाण्याची पातळी कमी होऊन उपसा पंपापर्यंत न पोहचल्यास त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. महापालिका पाणीपुरवठा विभागाने बंधाऱ्याचे पाणी अडविण्यासाठी एका एजन्सीला निमंत्रित केले असून, पोती टाकून पाण्याची पातळी कायम राखण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रभारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.

दरवर्षी मेच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात धरणातील पाणीसाठ्याची चर्चा सुरू होते. राधानगरी, दूधगंगा, तुळशी आणि कुंभी-कासारी ही धरणे कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरले आहेत. दरवर्षी ही धरणे शंभर टक्के भरली की बिगर सिंचन आणि सिंचनाचे वेळापत्रक निश्‍चित होते. साधारणतः १५ मे नंतर उपसाबंदी लागू केली जाते. जून उजाडला की जलसंपदा विभागाचे हवामान खात्याच्या अंदाजाकडे लक्ष लागून राहते.

राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या दूरदृष्टीतून राधानगरी धरणाची उभारणी झाली आणि त्यांच्या कृपेमुळेच अन्य जिल्ह्यासारखी स्थिती कोल्हापूरच्या तरी वाट्याला आलेली नाही.

राधानगरी धरणात आणखी १५ ते २० दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. २०१५ सारखी स्थिती यावर्षी नाही. त्यावेळी याचवेळी मृत साठ्यातील पाण्याचा वापर करण्याची वेळ येऊन ठेपली होती. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातही पुरेसा साठा आहे. कोल्हापूर शहराला पाणीटंचाईला सामोरे जायचे नसेल तर शिंगणापूर बंधाऱ्याची गळती रोखण्याचे काम तातडीने हाती घ्यावे लागेल. धरणात पुरेसा साठा असला तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा. दुर्दैवाने पाऊस लांबलाच तर अडचणी निर्माण होऊ शकतात.
- रोहित बांदिवडेकर, 

कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com