महापुराचा 134 पुरवठा योजनांना तडाखा ; चार कोटींवर नुकसान 

महापुराचा 134 पुरवठा योजनांना तडाखा ; चार कोटींवर नुकसान 

कऱ्हाड ः महापुराने कृष्णा-कोयना या दोन मुख्य नद्यांसह जिल्ह्यातून वाहणाऱ्या अन्य नदीकाठच्या पाणीयोजना धोक्‍यात आल्या आहेत. जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड, जावळी, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्‍यांतील 134 पाणी योजनांना महापुराचा फटका बसून तब्बल चार कोटी तीन लाख 87 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर काळात संबंधित पाच तालुक्‍यांतील तब्बल एक लाख 29 हजार 293 लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. 

नुकसानग्रस्त योजनांपैकी अनेक योजना नव्याने सुरू कराव्या लागणार आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना तात्पुरत्या स्वरूपात पाणी सुरू करण्यात आले आहे. मात्र, ते पुरेसे नसल्याने महापुराच्या संकटातून सावरत असतानाच संबंधित गावांतील ग्रामस्थांचे पुन्हा हाल सुरू होणार असल्याने आगीतून उठून फोफाट्यात पडल्यासारखी स्थिती होणार आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी संबंधित गावांतील ग्रामपंचायतींनी नदीकाठी पाणी योजना सुरू केलेल्या आहेत. त्याद्वारे सुरळीत पाणीपुरवठाही सुरू होता. मात्र, जिल्ह्यात पाच ते 10 ऑगस्ट दरम्यान महापुराने थैमान घातले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. महापुराचे पाणी घरात जावून अनेक घरेही बाधित झाली आहेत. त्यामुळे अनेकांना स्थलांतरित व्हावे लागले. महापूर ओसरल्यानंतर काही ठिकाणी नदीकाठच तुटून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे नदीकाठच्या पाणी योजनांना मोठे नुकसान पोचलेले आहे. नदीकाठच्या पाणी योजनांच्या काही मोटारी वाहून गेल्या, जॅकवेलला धोका निर्माण झाला आहे, काही योजनांच्या वायरिंगमध्ये दोष निर्माण झाला, काही ठिकाणी मोटारी खराब झाल्या आहेत, काही योजना या पूर्णतः नव्या कराव्या लागणार आहेत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील 86, कऱ्हाड तालुक्‍यातील 21, महाबळेश्वर तालुक्‍यातील 23, खंडाळा तालुक्‍यातील तीन आणि जावळी तालुक्‍यातील एक अशा 134 पाणी योजनांना धोका पोचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापुराच्या काळात संबंधित गावांतील एक लाख 29 हजार 293 लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. मात्र, त्यावेळीही लोकांनी त्यावर मात केली. मात्र, संबंधित पाणी योजनांचे महापुराने चार कोटी तीन लाख 87 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित योजनांपैकी काही गावांना अजूनही पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. मात्र, बहुतांश गावांत तात्पुरती पाण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, तीही पुरेशी नाही. त्यामुळे महापुरातून तावून सुलाखून निघालेल्या संबंधित गावांतील लोकांना पुन्हा नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत वाटच पाहावी लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com