म्हैसाळ योजनेतून पाणीउपसा सुरु

म्हैसाळ योजनेतून पाणीउपसा सुरु

सांगली - तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर म्हैसाळ सिंचन योजनेचे आवर्तन आज पुन्हा सुरु झाले. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील पाच पंप सुरु करण्यात आले. मिरज, तासगाव, जत, कवठेमहांकाळ आणि सांगोला या पाच तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.  

यंदाच्या हंगामात पाऊस झाला नाही; त्यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या आशेने शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेच्या पाण्याची मागणी नोंदवली नव्हती. योजनेचे गेल्या हंगामातील आवर्तन 3 जुलैरोजी बंद झाले होते. त्यानंतरचे तीन महिने पावसाअभावी कोरडेच गेले.

सद्यस्थितीला शेतकऱ्यांकडे म्हैसाळ योजनेची थकबाकी शिल्लक नाही. गेल्या आवर्तनातील उपशाचे 19 टक्के बिल शेतकऱ्यांनी आणि उर्वरीत 81 टक्के शासनाने जमा केले. सध्या उपसा पुन्हा सुरु करावा अशी मागणी होत होती; प्रत्यक्षात मागणी अर्ज मात्र शेतकरी भरत नव्हते. गेल्या काही दिवसांत योजनेच्या अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन मागणी नोंदवण्याचे आवाहन केले होते; त्याला प्रतिसाद मिळाला; त्यामुळे आज उपसा सुरु करण्यात आला. 

म्हैसाळमध्ये पहिल्या पंपगृहातील पंपांचे बटण कर्मचाऱ्यानेच दाबले. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत पाच पंप सुरु झाले होते. पाणी पहिल्या वितरण हौदातून बेडग कालव्याकडे वेगाने झेपावले. अधिकाऱ्यांनी सांगितले कि, आवर्तन किमान दोन महिने सुरु राहील. सध्या फक्त मुख्य कालव्यातून पाणी सोडू; मागणीनुसार उपकालवे, शाखा कालवे आणि वितरिकांचे दरवाजे उघडले जातील. शेतकऱ्यांनी पैसे भरले तरच पाणी मिळेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com