शहरांप्रमाणे तालुकास्तरावरही आठवडा बाजार

शहरांप्रमाणे तालुकास्तरावरही आठवडा बाजार

कऱ्हाड - शेतकऱ्यांना मोठ्या शहरात भाजीपाला विकता यावा, यासाठी पणन विभागाच्या पुढाकाराने मोठ्या शहरात आठवडा बाजार ही संकल्पना सुरू करण्यात आली. 

मंत्रालयासमोर सुरवात झालेला हा आठवडा बाजार अनेक मोठ्या शहरांत सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, शहराचे अंतर गावापासून अनेक मैल दूर असल्याने शेतकऱ्यांचा माल जरी विकला जात असला तरी त्याला अपेक्षित असा नफा मिळत नाही. त्याचा विचार पणन विभागाने करून शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळावेत, यासाठी आता तालुका पातळीवरही आठवडा बाजार ही संकल्पना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची कार्यवाही ‘पणन’कडून सध्या सुरू आहे. 

शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत सौद्यासाठी आणून तेथे व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या दरावर तो विकावा लागत होता. त्यामध्ये शेतकऱ्यांपेक्षा मध्यस्थांनाच जास्त मोबदला मिळत होता. अनेकदा दर पाडले जात असल्याने शेतकऱ्यांनी त्यासाठी घातलेले पैसे सोडाच, वाहतूक भाडेही अंगावर पडत असल्याची दररोज उदाहरणे घडत आहेत. 

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचा दर ठरवण्याचा अधिकार त्यांना नव्हता. त्यामुळे मातीमोल भावाने तो विकावा लागत होता. त्याचा विचार करून शासनाने त्यामध्ये बदल करण्यासाठी पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना आता शेतमाल घेवून बाजार समितीत सौद्यासाठी न जाता थेट बाजारात येण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल मोठ्या शहरात विकता यावा, यासाठी जागा उपलब्ध करून देवून तेथे त्यांना तो माल विकण्याचीही सोय करण्यात आली आहे. त्यासाठी आठवडा बाजार ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. 

पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंत्रालयासमोर भाजीपाला विक्रीसाठी जागा घेवून तेथे आठवडी बाजार सुरू केला. तेथून राज्यातील अनेक ठिकाणच्या मोठ्या शहरात असे बाजार सुरू झाले आहेत. हे बाजार 
सुरू झाले असले तरी शेतकरी गट, काही कंपन्यांच्या माध्यमातून तेथे शेतमाल नेला जातो. 

सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याचा माल विकायचा असेल तर तो अनेक किलोमीटर दुरवरून तेथे न्यावा लागतो. तो माल तेथे नेणे आर्थिकदृष्टया एकट्या शेतकऱ्याला परवडत नाही. त्याचा विचार करून आता पणन विभागाने तालुक्‍याच्या ठिकाणीही आठवडी बाजार सुरू करून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू केला असून तसा प्रस्तावही तयार केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तेथे माल नेवून विकणे सहज शक्‍य होईल. 

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमाल विक्रीची व्यवस्था करण्यासाठी राज्यातील मोठ्या शहरांत आठवडा बाजार सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील छोट्या शेतकऱ्यालाही माल विकता यावा, यासाठी तालुका पातळीवरही असे बाजार सुरू करण्यात येतील.
- सदाभाऊ खोत, कृषी व पणन राज्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com