पश्‍चिम महाराष्ट्र कोकणाला जोडूच - प्रभू

कोल्हापूर - रेल्वे प्रवासी आरामगृहाचे उद्‌घाटन करताना केंद्रीय मंत्री  सुरेश प्रभू. शेजारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक .
कोल्हापूर - रेल्वे प्रवासी आरामगृहाचे उद्‌घाटन करताना केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू. शेजारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक .

कोल्हापूर - ‘पश्‍चिम महाराष्ट्रातील शेती व औद्योगिक उत्पादनांसाठी कोल्हापूर-कोकण रेल्वे जोडली जात आहे. यातून पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल. म्हणून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे,’’ असे ठोस आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य व नागरी विमान उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे दिले. कोल्हापूर-वैभववाडी आणि कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. दोन्ही प्रकल्प यशस्वी करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.    

पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापन कार्यालयातर्फे छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर विश्रामगृह, पादचारी पुलाचे उद्‌घाटन आणि फलाट बांधकाम व विस्तारीकरणाची पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. त्या वेळी ते बोलत होते. महापौर सरिता मोरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे, आमदार अमल महाडिक प्रमुख उपस्थित होते.   श्री. प्रभू म्हणाले, ‘‘रेल्वेत सर्वसामान्यांच्या हिताच्या सुविधा असाव्यात. अशी सेवा देशभर देण्यासाठी अनेक घोषणा झाल्या. त्यासाठी ८५४ कोटींची तरतूद केली होती. त्यातून देशातील रेल्वेस्थानकांवर सुधारणा होत आहेत. त्याचाच भाग म्हणून कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवर सुविधा होत आहेत.’’

ते म्हणाले, ‘‘पूर्वी रेल्वे सुविधांना मर्यादा होत्या. यात कॅन्टीन सुविधांपासून ते सामान वाहून नेण्याच्या तांत्रिक साधनापर्यंत अनेक गोष्टींची कमतरता होती. आता रेल्वेला निधी मिळाला. त्यातून पायाभूत सुविधा देण्यावर भर आहे. गेल्या सात वर्षांत देशातील सर्व ट्रॅकचे नूतनीकरणाचे काम झाल्याने अपघातांची संख्या घटली आहे.’’

ते म्हणाले, ‘‘पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतीमालाला बाजारपेठ मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी रेल्वे उपयोगी ठरेल. म्हणून कोल्हापूर रेल्वे कोकणाला जोडण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर मार्गाचे काम सुरू झाले. कऱ्हाड-चिपळूण मार्गही जोडणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे ते काम थांबले. दोन्ही प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत, यासाठी मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे.’’ 

ते म्हणाले, ‘‘या प्रकल्पांद्वारे शेतीमालाची वाहतूक बंदरापर्यंत सुकर होणार आहे. त्यातून निर्यातीचा मार्ग सुखकर होईल. त्याचा लाभ पश्‍चिम महाराष्ट्राला होणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्र देशातील सर्वांत महत्त्वाचा विकास झालेला भाग व्हावा, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेही प्रयत्नशील राहतील.’’  

मंडल प्रबंधक मिलिंद देऊस्कर यांनी स्वागत केले. वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कृष्णात पाटील, संचालक संजीव सिन्हा, के. आर. डांगे, प्रबंधक गौरव झा, रेल्वेचे महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंग, प्रवासी समितीचे शिवनाथ बियाणी यांच्यासह अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com