सोलापूर : संभाजी तलावात परिसरातील सोसायट्यांमधील ड्रेनेजचे पाणी मिसळत आहे. धोबी घाटाचे पाणीही तलावातच सोडले जाते, शिवाय तलावाच्या काठावर जागोजागी कचरा टाकल्याने संपूर्ण परिसर प्रदूषित झाला आहे. हे माहिती असतानाही 11 दिवस मनोभावे पूजन केलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे तलावातील घाण पाण्यात विसर्जन केले जात आहे.
सर्वच देवांची कोणत्याही प्रकाराने विटंबना होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. चुकून जर विटंबना झालीच तर मनोमन देवाची माफी मागून शक्य ती दुरुस्ती करण्याचा प्रयत्नही होतो. संभाजी तलावात गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे. यासंदर्भात पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन, शासन याकडे अपेक्षित असे लक्ष देत नाही. संभाजी तलाव परिसरात महापालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी हौद बांधले आहेत, पण हौदाचा वापर होत नसल्याचे चित्र आहे. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वर आल्याचे आपल्यापैकी अनेकांनी पाहिले आहे.
घाण पाण्यातील बाप्पांच्या विसर्जनाबद्दल स्मार्ट सोलापूरकरांनी विचार करायला हवा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती ऐवज मातीचे गणेशमूर्ती स्थापन केले तर लाडक्या बाप्पाचे घरच्या घरीही विसर्जन करता येऊ शकते, असे धर्मशास्त्र अभ्यासकांचे म्हणणे आहे.
संभाजी तलाव प्रचंड प्रदूषित झाला आहे. प्रदूषित तलावातील पाण्यात बाप्पांची मूर्ती विसर्जित करणे हे मनाला पटत नाही. सोलापूरकरांनी पर्यावरणपूरक म्हणजेच मातीच्या गणेशाची स्थापना करावी. पार्थिव गणेशाची म्हणजेच मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करावी असे शास्त्रात सांगितले आहे. गणेशोत्सवानंतर घरच्या घरी बाप्पांचे विसर्जन करता येईल. आम्ही स्वत: गेल्या अनेक वर्षांपासून घरीच विसर्जन करतो. तलावाचे प्रदूषण थांबले पाहिजे, शिवाय बाप्पांची विटंबनाही थांबायला हवी.
- डॉ. अपर्णा कल्याणी, धर्मशास्त्राच्या अभ्यासक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.