सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्का बसणार का ?

Will BJP be shocked at Sangli Zilla Parishad
Will BJP be shocked at Sangli Zilla Parishad

सांगली - राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अखेर स्थापन झाले आहे. आता राज्यात तातडीने होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात ही नवी आघाडी आकार घेण्याची तयारी सुरू आहे. सांगली जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेवरून पायउतार करत नवे समीकरण बांधण्यासाठी राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत. येथील राष्ट्रवादी सदस्य मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन याबाबत दोन दिवसांत चर्चा करणार आहेत. 

त्यानंतर आमदार मोहनराव कदम, विश्‍वजीत कदम, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, शिवसेना नेते अजितराव घोरपडे, वैभव नायकवडी अशा महाराष्ट्र विकास आघाडीशी निगडीत नेत्यांशी खलबते केली जातील. राष्ट्रवादीच पुढाकार घेऊन याबाबतची आखणी करणार आहे.

राष्ट्रवादीकडून अश्विनी नाईक चर्चेत

जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीकडून एकमेव अश्‍विनी राजेंद्रसिंह नाईक (चिखली, ता. शिराळा) यांचा दावा असू शकतो. काँग्रेसकडे शारदा पाटील (पणुंब्रे तर्फ) आणि कलावती गौरगोंड (कोळगिरी, जत) ही दोन नावे आहेत, मात्र सत्ता बदलाच्या समीकरणाचा सुकाणू राष्ट्रवादीच्या हाती असेल आणि राष्ट्रवादीलाच अध्यक्षपद मिळावे, यासाठी नियोजन केले जाईल, हे जवळपास आता स्पष्ट आहे. ही मोट बांधणे राज्यातील सरकार स्थापनेइतकेच आव्हानात्मक असणार आहे. जयंत पाटील यांचा अशा गोष्टींत हातखंडा आहे. त्यात अनिल बाबर यांची समजूत काढणे एवढेच आव्हान असेल, मात्र राज्यात भाजपसोबत परिस्थिती ताणली गेली असल्याने ‘मातोश्री’चा आदेश डावलणे त्यांना सोपे असणार नाही. 

भाजप इच्छुकही दक्ष

जिल्हा परिषदेत नवी समीकरणे आकाराला येतील, अशी चिन्हे असली तरी भाजपलाही आपलेच गणित जुळेल, असा विश्‍वास वाटतो. त्यामुळे इच्छुकांनी भेटीगाठींचा धडाका लावला आहे. यावेळी माजी मंत्री सुरेश खाडे समर्थकाला संधी मिळण्याची शक्‍यता भाजपच्या पातळीवर वर्तवली जात आहे. त्यात आरग येथील सरिता कोरबू आणि म्हैसाळ येथील प्राजक्ता कोरे यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय, तडसर येथील ॲड. शांता कनुंजे, हरिपूर येथील शोभा कांबळे आणि दुधोंडी येथील अश्‍विनी पाटील यांचाही दावा आहे. 

पक्षीय बलाबल असे

  • भाजप - २३ + 2 (पुरस्कृत)
  • राष्ट्रवादी १४ ( रिक्त एक)
  • काँग्रेस ०८ ( रिक्त दोन)
  • शिवसेना ३
  • विकास आघाडी ४
  • घोरपडे समर्थक २ 
  • स्वाभिमानी १

जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनानेच सत्ताबदल

दोन दिवसांपूर्वी मुंबईत जयंत पाटील यांची भेट घेतली; मात्र तेथे खूप घाई होती. जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाचा कार्यक्रम अजून जाहीर झाला नाही. त्याआधी आम्ही दोन-तीन दिवसांत त्यांच्याशी प्राथमिक चर्चा करू. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताबदलाच्या समीकरणांवर चर्चा होणार आहे.
- शरद लाड, विरोधी गटनेते, जिल्हा परिषद

काँग्रेससोबत सत्तेची नवी समीकरणे

जयंत पाटील यांच्याशी आमचा वाळवा तालुक्‍यात संघर्ष आहे; मात्र जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत सत्तेची नवी समीकरणे जुळत असतील तर आम्ही जरूर विचार करू. अर्थात प्रस्ताव समोर आल्यानंतर सारे सदस्य मिळून नेत्यांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेतील.
- जितेंद्र पाटील, जि. प. सदस्य, काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com