संपूर्ण कर्जमाफीशिवाय थांबणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

कऱ्हाड - संघर्ष यात्रेदरम्यान गुरुवारी आयोजित जाहीर सभेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण. व्यासपीठावर जोगेंद्र कवाडे, जयंत पाटील, आबू आझमी, सुनील तटकरे, अजित पवार, प्रणिती शिंदे, विद्या चव्हाण, सुमन पाटील आदी.
कऱ्हाड - संघर्ष यात्रेदरम्यान गुरुवारी आयोजित जाहीर सभेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण. व्यासपीठावर जोगेंद्र कवाडे, जयंत पाटील, आबू आझमी, सुनील तटकरे, अजित पवार, प्रणिती शिंदे, विद्या चव्हाण, सुमन पाटील आदी.

कऱ्हाड - शेतकऱ्यांना कर्मजाफी दिली, तर आर्थिक शिस्त बिघडेल, असे उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर, आर्थिक सल्लागार सांगत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये विजयी केल्यास कर्जमाफी करू, अशी घोषणा त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. तेथे कर्मजाफी दिल्यानंतर त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना आर्थिक शिस्त बिघडेल, असा सल्ला का दिला नाही? त्यावेळी त्यांची बोलती बंद झाली होती का, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केला. 

संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, प्रसंगी आंदोलन तीव्र करू, असा इशाराही त्यांनी दिला. 

मध्यावधी निवडणुका लावणार असाल, तर लावून बघाच असाही इशारा त्यांनी सरकारला दिला. 

संघर्ष यात्रेदरम्यान येथे झालेल्या जाहीर सभेत श्री. चव्हाण बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, प्रा. जोगेंद्र कवाडे,आबू आझमी, सुनील केदार, जितेंद्र आव्हाड, प्रवीण गायकवाड, श्रीमती सुमन पाटील, विद्या चव्हाण, प्रणिती शिंदे, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, शशिकांत शिंदे, मोहनराव कदम यांच्यासह राज्यातील आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. 

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘संघर्ष यात्रा राजकीय हेतूने काढली आहे, अशी आमच्यावर टीका झाली. आता निवडणुका नाहीत. ज्या शेतकऱ्यांचे आम्ही प्रतिनिधित्व करतो, तो शेतकरी उद्‌ध्वस्त होऊ लागला आहे. त्याला वाचवण्यासाठी, त्याची कर्जमाफी होण्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष रस्त्यावर उतरलो आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून नऊ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी विदर्भ-मराठवाड्यात आत्महत्या होत होत्या. त्याचे लोण आता पश्‍चिम महाराष्ट्रातही पोचले आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवेळी पंतप्रधानांनी कर्मजाफीची घोषणा केली. जे आश्‍वासन नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी दिले, त्याचे रेकॉर्डिंग झाले आहे. त्यापासून त्यांना लांब पळता येणार नाही. त्याच घोषणांची अंमलबजावणी करा, कर्जमाफी करा, अशी आमची मागणी आहे. तूर खरेदी केली जात नाही. अजूनही लाखो टन तूर बाजार समितीत पडून आहे. ती सरकारला खरेदी करावीच लागेल. कृषी अर्थव्यवस्था, सहकार चळवळ खिळखिळी करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. कर्जमाफीस ३० हजार कोटी लागणार आहेत. सरकार मात्र नऊ बड्या उद्योजकांची साडेआठ लाख कोटींची कर्जमाफी करण्यात गुंतले आहे.’’ 

श्री. तटकरे म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची शपथ आम्ही घेतली. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळावी, यासाठी ही संघर्ष यात्रा असून, जोपर्यंत ती देत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. १ मे रोजी ध्वजवंदन केल्यानंतर तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांना तूर भेट दिली जाईल. वेळ आलीच तर तूर फेकण्याचेही आंदोलन केले जाईल.’’ 

पतंगराव कदम, प्रा. जोगेंद्र कवाडे, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश पाटील-वाठारकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com