पिंपरी-चिंचवडमधील 40 कम्युनिटी किचन झाली बंद!

पिंपरी-चिंचवडमधील 40 कम्युनिटी किचन झाली बंद!

पिंपरी : गरजू आणि गोरगरीब लोक अन्नापासून वंचित राहू नयेत, यासाठी शहरात ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्था-संघटनांच्या सहकार्याने सुरू केलेल्या कम्युनिटी किचनचा धान्य पुरवठा पालिकेने थांबविला आहे. तसेच निरनिराळ्या कारणांमुळे 56 पैकी 40 कम्युनिटी किचन देखील बंद झाले आहेत. 

सध्या केवळ 16 कम्युनिटी किचनच कार्यरत आहेत. सुमारे 2 महिन्यांपासून शहरामधील इस्कॉन-अन्नामृत फाउंडेशनसह अनेक स्वयंसेवी संस्था-संघटनांकडून गरजू लोकांना जेवण पुरविले जात होते. त्यामध्ये टाटा मोटर्स, फोर्ब्ज मार्शल यासारख्या नामवंत कंपन्यांनीही योगदान दिले. त्यामुळे दररोज सुमारे सव्वा लाखांपर्यंत गरजू लोकांना जेवण पुरविण्यात महापालिकेला यश आले होते. स्वयंसेवी संस्था-संघटनांच्या कार्यात खंड पडू नये म्हणून महापालिकेमार्फत जिल्हा अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून गहू, तांदूळही मागविण्यात येत होते. त्याचप्रमाणे गरजेनुसार, विविध संस्था-संघटनांना पुरविले जात होते. मात्र, सध्या महापालिकेने हे धान्य देणे थांबविले आहे. परिणामी, काही संस्था-संघटनांची कम्युनिटी किचन बंद झाली आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खोत म्हणाले, "राज्य शासनाने काही अटी-शर्थींवर उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली असून बरेच उद्योग चालू झाले आहेत. 'पीएमपी' बससेवाही सुरू झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत स्वयंसेवी संस्थांचे कम्युनिटी किचनचा धान्य पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, त्यांना धान्य देणे बंद करण्यात आले आहे. सध्या 56 पैकी 40 कम्युनिटी किचन बंद झाले असून केवळ 16 स्वयंसेवी संस्थांचे किचन स्वखर्चाने चालू आहेत. स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने, सध्या आम्ही प्रतिबंधित क्षेत्रातील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये तयार जेवण पुरवित आहोत.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

श्री काळभैरवनाथ उत्सव समितीचे समन्वयक ओंकार गौरीधर म्हणाले, "आम्ही मागील 2 महिन्यांपासून गरजू लोकांना जेवण देत होतो. अन्नदानात खंड पडू नये म्हणून महापालिकेने विविध संस्थांना गहू,तांदूळाची मदत चालू केली होती. मात्र, ही मदत बंद झाली आहे. आमचे कार्यकर्ते देखील अनेक दिवसांपासून राबत आहेत. त्यामुळे, आम्ही आमचे कम्युनिटी किचन बंद केले आहे. सध्या केवळ प्रतिबंधित क्षेत्रातील गरजू लोकांना आवश्‍यकतेनुसार जेवण देत आहोत.'' 

गैरप्रकार झाल्याने धान्य पुरवठा बंद? 

जिल्हा अन्नधान्य वितरण कार्यालयाने पाठविलेला गहू, तांदूळ चांगल्या दर्जाचा नसल्याची तक्रार काही स्वयंसेवी संस्थांनी केली होती. तर काही संस्थांनी हे धान्य स्वीकारण्यास नकार दिला होता. काही संस्थांचे राजकीय नेतेमंडळींशी लागेबांधे आहेत. त्यामधून, गैरप्रकार झाल्याने पालिकेने धान्य पुरवठा बंद केल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com