ज्येष्ठ नागरिकांची सवलत अद्याप बंद

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष; पुन्हा सुरू करण्याची मागणी, खिशाला झळ
Neglect of railway administration Concessions for senior citizens are still closed pimpri
Neglect of railway administration Concessions for senior citizens are still closed pimprisakal

पिंपरी : कोरोना संसर्गाची तिसरी लाटही ओसरत आली असून, रेल्वेची प्रवासी वाहतूक आता पूर्णपणे सुरळीत झाली आहे. कोरोना काळात धावणाऱ्या गाड्यांचा विशेष दर्जा काढून त्या नियमित झाल्या आहेत. तरी कोरोनाकाळापूर्वी रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर मिळणारी ३० टक्क्यांची सवलत अजूनही बंद असल्याने अनेकांच्या खिशाला झळ बसत आहे. ही सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.

दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वे सेवा सुरु झाली. गतवर्षी डिसेंबरमध्ये रेल्वे गाड्यांचा विशेष दर्जाही काढून त्या नियमित धावू लागल्या आहेत. तथापि आरक्षित तिकिटांवर प्रवास करण्याची अट मात्र अजूनही लागूच आहे. खिडक्यांवरील तिकीट विक्री अद्यापही सुरू झाली नाही. याशिवाय कोरोनाकाळापूर्वी रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात मिळणारी सवलत अद्यापही पूर्ववत झालेली नाही. सर्व गाड्या नियमित झाल्यानंतरही सवलत बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना नाहक महागडे तिकीट काढावे लागत आहे.

किती मिळते सवलत?

रेल्वेच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना मूळ भाड्याच्या तीस टक्के सवलत देण्यात येते. ही सवलत सर्वच प्रकारच्या श्रेणीमध्ये लागू आहे. एखाद्या गाडीत प्रवास करण्यासाठी प्रवाशाला १०० रुपये तिकीट असेल, तर ज्येष्ठ नागरिकांना या सवलतीनुसार केवळ ७० रुपये तिकीट मोजावे लागते.

विशेष रेल्वेचा दर्जा काढला

कोरोना काळात ठप्प असलेल्या रेल्वेगाड्या पुन्हा सुरु केल्यानंतर त्या गाड्या काही महिने ‘विशेष दर्जा’ म्हणून चालविण्यात आल्या. या गाड्यांच्या क्रमांकापूर्वी शून्य लावण्यात आला होता. आता हा शून्य काढून या गाड्या नियमित सुरु करण्यात आल्या आहेत. तथापि, रेल्वेत पूर्वी मिळणाऱ्या बहुतांश सवलती बंद आहेत.

बेमुदत उपोषणाचा इशारा

रेल्वेच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलतींसह इतर सवलती लवकरच सुरु करण्याची मागणी अनेकदा मागणी केली आहे. यासंदर्भात सकारात्मक विचार सुरु असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पण ज्येष्ठांकडे लक्ष दिले जात नाही. यामुळे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ‘ज्येष्ठ नागरिक सेल’चे आणि माजी सैनिक लक्ष्मण रूपनर यांनी दिला आहे.

पूर्वी रेल्वेत तिकिटावर ३० टक्के सवलत मिळत असे. त्यामुळे प्रवास करणे खिशाला जड जात नव्हते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ही सवलत बंद आहे. त्यामुळे महागडे तिकीट काढावे लागत आहे. यातून रेल्‍वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे ज्येष्ठांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

-विश्‍वनाथ खंडाळे, ज्येष्ठ प्रवासी, माजी केंद्रीय कर्मचारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com