पिंपरी : प्रभाग रचनेच्या निर्णयाकडे लक्ष

पिंपरी महापालिकेची आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार, असे सूतोवाच मंगळवारी (ता. २८) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर करण्यात आले.
PCMC
PCMCSakal

पिंपरी - महापालिकेची आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार, असे सूतोवाच मंगळवारी (ता. २८) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर करण्यात आले. तरीही, एक किंवा दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होऊ शकते, अशी अपेक्षा अन्य इच्छुक व छोट्या पक्षांना आहे.

महापालिकेची आगामी निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरणार आहे. कोविड महामारीनंतर होणारी ही पहिलीच निवडणूक ठरणार आहे. या पूर्वीच्या निवडणुका काही ना काही प्रभावांनी झाल्या आहेत. गेल्या वीस वर्षांचा विचार केल्यास पंधरा वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि गेली पाच वर्ष भाजपची महापालिकेत सत्ता आहे. आगामी निवडणुकीत भाजपला सत्ता राखायची आहे आणि राष्ट्रवादीला महापालिका पुन्हा ताब्यात घ्यायची आहे. शिवसेनेला महापौर करायचा आहे.

कॉंग्रेसला अस्तित्व निर्माण करायचे आहे. मनसेला संख्याबळ वाढवायचे आहे. अन्य छोट्या पक्षांना नशीब आजमावून महापालिकेत प्रवेश करायचा आहे. त्यामुळे आगामी निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरणार आहे. सध्याची राजकीय स्थिती आणि संभाव्य प्रभाग रचनेच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांतील ‘जाणकार’ सतर्क झाले आहेत. प्रभाग रचना कशी झाल्यास? आपली बाजू कशी जमेची राहील? याबाबत गणिते मांडत आहेत. कोणत्या गावात, कोणत्या गल्लीत, कोणत्या सोसायटीत, कोणत्या झोपडपट्टीत, कोणाचे प्राबल्य आहे. आपल्याला तेथून कसा मतांचा फायदा होऊ शकतो, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

अशा झाल्या निवडणुका

२००२ ची निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतरची पहिलीच निवडणूक होती. ही निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली होती. कोणालाही स्पष्ट बहुमत नव्हते. मात्र, अपक्षांना ‘भाव’ आला होता. त्यांची संख्या १२ होती. अखेर काही पक्षांच्या अप्रत्यक्ष सहकार्याने पाच वर्षे राष्ट्रवादीची सत्ता राहिली.

२००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्या वेळी एक सदस्य प्रभाग रचना होती.

२०१२ ची निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली. तेव्हाही राष्ट्रवादीनेच बाजी मारली होती.

२०१७ ची निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने झाली. आणि भाजपने एकहाती महापालिका ताब्यात घेतली. मात्र, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव होता. शिवाय, राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

२०२२ ची निवडणूक कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. त्यातही राज्यात तीन पक्षांचे महविकास आघाडी सरकार आहे. प्रभाग रचनेबाबत निर्णय अद्याप ठाम नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com