
शेतकऱ्यांनी बीजप्रक्रियेचा अवलंब करावा ः विटे
इंदोरी, ता. ९ ः सध्या खरीप भात पिकाची रोपे तयार करण्यासाठी पेरणीची लगबग सुरू झाली आहे .त्या अनुषंगाने विभागीय
कृषी सहायक गणेश विटे यांनी सांगुर्डी व कान्हेवाडीतर्फे चाकण येथे शेतकऱ्यांची कार्यशाळा घेतली. भात उत्पादन वाढीसाठी बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने शेतकऱ्यांनी बीजप्रक्रियेचा अवलंब करावा, असे आवाहन करून प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
बियाणाद्वारे व जमिनीतून पसरणारे रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी करून पिकाची वाढ होण्यासाठी बीजप्रक्रिया कमी खर्चाचे व अत्यंत प्रभावी साधन आहे. प्रथम मिठाचे पाण्याची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर बुरशीनाशक प्रक्रिया करावी व नंतर जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. प्रथम मिठाचे पाण्यात भातबियाणे ओतून चांगले ढवळावे. नंतर द्रावण स्थिर झाल्यावर पोकळ व रोगग्रस्त हलके तरंगणारे बियाणे अलगद वरचेवर काढून घ्यावे व तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे काढून घेऊन ते दोन तीनदा स्वच्छ पाण्यात धुवावे. सावलीत २४ तास वाळवावे. मीठ द्रावणासाठी १० लिटर पाणी व ३०० ग्रॅम मीठ असे प्रमाण ठेवावे. त्यानंतर बुरशीनाशक बीजप्रक्रिया करावी. बियाणात राहिलेल्या तसेच उगवणीनंतर पिकास अपायकारक असणाऱ्या बुरशीचा नायनाट होतो. थायरप किंवा कॅप्टन २.५ ग्रॅम या प्रमाणात एक किलो, बियाणास पेरणीपूर्वी चोळावे. शेवटी जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. बियाणे रुजल्यापासून पिकाच्या पुढील वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र व स्फुरद सहज उपलब्ध होण्यासाठी जिवाणू बीजप्रक्रिया गरजेची आहे. त्यात १० किलो बियाणासाठी २५० ग्रॅम पी. एस. पी. चा वापर करावा. जिवाणू खताची बीजप्रक्रिया झाल्यानंतर थोडे गुळाचे पाणी शिंपडून बियाणास चोळावे, अशी माहिती प्रात्यक्षिकासह गणेश विटे यांनी शेतकऱ्यांना दिली. अगदी वेळेत माहिती मिळाल्याने शेतकरी आनंदित होते. सरपंच भाऊसाहेब पवार व सरपंच वसंत भसे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Idr22b01193 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..