
नदी प्रदूषण टाकण्यासाठी नवा उपक्रम
इंदोरी, ता. १४ ः आदर्श ग्राम कान्हेवाडी तर्फे चाकण (ता. खेड) चे आदर्श सरपंच भाऊसाहेब पवार यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यविधी नंतरचे रक्षा विसर्जन इंद्रायणी नदी पात्रात न करता, राखेचे खत घालून वृक्षारोपण केले. कान्हेवाडी तर्फे चाकण गावाने आतापर्यंत ग्राम स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण व संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी व्यवस्था अशा विविध विकास कामांबाबत राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार पटकावून ‘मॉडेल’ गावाचा दर्जा प्राप्त केला आहे. तसेच इंद्रायणी नदीचा प्रवाह स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहेच.
अंत्यविधीचे रक्षाविसर्जन नदी पात्रात करणे ही रूढी भावनिक आहे. यामुळे ही परंपरा थांबवणे कठीण आहे. नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखण्यासाठी नदीपात्रात रक्षाविसर्जन न करण्याची इच्छा कृतीत आणण्याकरिता स्वत:च्या घरापासून सुरुवात केली. अशी प्रतिक्रिया सरपंच भाऊसाहेब पवार यांनी व्यक्त केली. गावागावांमधून या उपक्रमाचे अनुकरण करावे. असे आवाहन पवार यांनी केले. सरपंच भाऊसाहेब पवार, बंधू दत्तात्रेय पवार, कैलास पवार तसेच संभाजी पवार, शिवाजी पवार यांनी कै. एकनाथ पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मशान भूमी जवळ वड व पिंपळ या देशी झाडांची लागवड केली. तसेच रक्षा विसर्जनाची राख झाडांना खत म्हणून घातली. या वृक्षांचे संगोपनाची जबाबदारी पवार कुटुंबीयांनी घेतली आहे.