
संवाद यात्रा नियोजनासाठी पिंपळे गुरवमध्ये बैठक
पिंपळे गुरव, ता. ४ ः मराठवाडा मुक्तिसंग्राम आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा भूमिपुत्र पिंपरी-चिंचवड शहर यांच्यावतीने १२ ते २३ जानेवारी २०२३ दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ''पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेच्या नियोजनासाठी मराठवाडा जनविकास संघाच्या पिंपळे गुरव येथील प्रांगणात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, सेंद्रिय कृषी शेतीतज्ज्ञ दिलीप देशमुख बारडकर, सूर्यकांत कुरुलकर,डॉ. प्रिती काळे, नितीन चिलवंत, जीवन बोराडे, बळिराम माळी, मुंजाजी भोजने, मच्छिंद्र चिंचोळे, वामन भरगंडे, प्रल्हाद लिपने, सुधाकर पऊळकर, दत्तात्रेय धोंडगे, शंकर तांबे, अण्णासाहेब मोरे, प्रा.डॉ. प्रवीण घटे, राजपूत समाज संघटनेचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बैस आदी उपस्थित होते.
अरुण पवार म्हणाले, की आपली दातृत्वाची भूमिका ठेवून कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा या ठिकाणाहून जाणाऱ्या या यात्रेसाठी सहकार्य व पाठबळ देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. दिलीप देशमुख बारडकर म्हणाले, की मराठवाडा सेंद्रिय शेती विद्यापीठ व ट्रेनिंग सेंटर उभे करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. डॉ. प्रिती काळे यांनी मराठवाड्यातील महिला, युवती यांचे पाठबळ मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या यात्रेची संकल्पना नितीन चिलवंत यांची आहे.
फोटोः 00541