
पैसे केंद्रीत करिअरपेक्षा कर्तृत्व केंद्रीत करिअर निवडावे
पिंपरी, ता.२४ ः ‘‘यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रचंड मेहनत व कष्टाची आवश्यकता आहे. त्यामुळे युवकांनी आपले ध्येय निश्चित करताना संवाद कौशल्ये विकसित केली पाहिजेत. व्यक्तिमत्त्व विकास हा केवळ बाह्य स्वरूपात न होता तो अंतर्मनाने सुद्धा झाला पाहिजे. पैसे केंद्रित करिअरपेक्षा कर्तृत्व केंद्रित करिअर निवडले पाहिजे’’, असे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक प्रा.विजय नवले यांनी केले.
सकाळ माध्यम समूहा च्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) या उपक्रमातंर्गत आयोजित
‘उद्योजकता व व्यक्तिमत्त्व विकास’ कार्यशाळेत ते बोलत होते. निगडी प्राधिकरण येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यशाळा झाली.
नवले म्हणाले, ‘‘अभ्यासासोबत सर्वांगिण विकास होणाऱ्या उपक्रमात युवकांनी सहभागी झाले पाहिजे. उद्योजक होताना आपल्यातील संवाद कौशल्यांचा उत्तम उपयोग होतो त्यामुळे सकारात्मक संवाद आपण जोपासला पाहिजे. वाचन, श्रवण ही पूरक तंत्रे आहेत तर लेखन व संवाद ही त्याची प्रकटनाची रूपे आहेत. वाचनाची आवड जोपासली पाहिजे. इंटरनेट व सोशल मीडिया चा वापर अभ्यास व स्वःविकसनासाठी केला पाहिजे. आदर्श व्यक्तिमत्त्वांचा मागोवा घेतल्यास व स्व शोध कायम घेत राहिल्यास आपल्याला आपली योग्य दिशा सापडू शकते.जी संधी मिळेल त्या संधीचे सोने करायला युवकांनी शिकले पाहिजे.’’
प्रियांका पॉल, आरिफ सय्यद, आमीर सय्यद, आयुष शेरखाने या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे प्राचार्य बसवराज विभूते, गटनिदेशक मनिषा गाढवे, हनुमंत सावंत, अर्जुन कदम उपस्थित होते. ‘सकाळ एनआयई’चे सहव्यवस्थापक विशाल सराफ यांनी कार्यशाळेचे संयोजन केले.
फोटो ओळः निगडी प्राधिकरण - सकाळ एनआयई आयोजित उद्योजकता व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावरील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा.विजय नवले (13717)