
अराजकता माजवणाऱ्या भाजपला पराभूत करा
पिंपरी, ता. २२ : देश आणि राज्यात अराजकाची स्थिती भारतीय जनता पक्षाने निर्माण केली आहे. त्याविरोधात मत मांडण्याची संधी या निवडणुकीने निर्माण केली आहे. ही निवडणूक तरूणांनी हाती घेतली असल्याने या निवडणुकीत नाना काटे यांचा विजय निश्चित असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी सांगवी येथे बुधवारी (ता. २२) व्यक्त केले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पवार यांच्या चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी पवार बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘देशात जातीय तणाव वाढवायचा. तोडा आणि फोडा या ब्रिटिशांच्या नितीनुसार हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करायचा. या साऱ्या राजकारणाच्या हीन पातळीला जनता वैतागली आहे. त्याचे उत्तर जनता मतपेटीतून देईल. नोटाबंदी, जीएसटी आणून सामान्य माणसांचे जीवन अवघड करून टाकले आहे. असे निर्णय घेण्यापूर्वी संसद आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही. लहरी राजाच्या बेबंद कारभाराला आळा घालण्याची सुरवात चिंचवडमधील पोटनिवडणुकीतून करावी.’’
दरम्यान; वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी रावेत येथील पवार यांच्या सभेत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
‘‘आम्ही केलेला विकास ‘आम्हीच केला’ असे खोटे रेटून बोलायची नवीन पद्धत त्यांनी विरोधकांनी केली आहे. या पक्षाला स्वत:चे कार्यकर्ते निर्माण करता आले नाहीत. हा महाराष्ट्र महात्मा फुले आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या विचारसरणीवर पोसलेला महाराष्ट्र जातीय विद्वेषाचे भूत फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भाजपला जागा दाखवण्याची वेळ आली आहे.’’
- शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस