
ऊस पेटवून दिला जात असल्याने नुकसान
इंदोरी, ता. १४ : संत तुकाराम सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील इंदोरी येथे ऊसतोडणी लवकर होण्याकरिता ऊसतोड कामगारांनी ऊस शेतातच पेटवून दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा वाईट कृत्यास कारखान्याने वेळीच आळा घालावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या आक्रोशास कारखान्याची जबाबदारी राहील, असा इशारा शेतकरी जगन्नाथ शेवकर (इंदोरी), सुदाम भसे (सांगुर्डी), तसेच शेतकऱ्यांनी दिला आहे. ऊस पेटवल्याने वजनात मोठ्या प्रमाणात घट होते, जळीत उसाला कारखाना कमी हमी भाव देतो, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
जगन्नाथ शेवकर यांचे इंदोरी गट क्र. ३५४-१ मधील ऊसतोड सुरू करताना घटनास्थळी मुकादम गोकुळे यांना नारळ-दक्षिणा देण्यात आली. तोडलेल्या उसाचे वाडे बांधून त्यांची कमी किमतीत विक्री केली आहे. ती रक्कम मजुरांना पदरात पाडून घ्यावी लागली. बाकीचा ऊस शेतातच पेटवून देण्यात आला, घडलेल्या प्रकाराबाबत विचारपूस केली असता उलट उत्तरे देण्यात आली. ही सर्व माहिती संचालक शिवाजी पवार व कारखान्याचे कर्मचारी संदीप बोत्रे यांच्यासोबत संपर्क करून माहिती दिली. तरी देखील काही कारवाई करण्यात आली नाही. झालेल्या नुकसानाची चौकशी करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची करीत आहेत.
२०९२
इंदोरी ः जगन्नाथ शेवकर यांचा ऊस ऊसतोड मजुरांनी पेटवून दिले.