
वराळे, आंबी एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ३ : शहराला औद्योगिक वसाहत व उत्तरेकडील ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, कामगार, विद्यार्थी यांचा नियमित प्रवास असणाऱ्या या रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून खड्ड्यांमधून मार्ग काढताना अनेक किरकोळ अपघातही घडत आहेत.
वराळे, आंबी एमआयडीसी परिसरात जाण्यासाठी इंद्रायणी नदीवर मागील अनेक वर्षांपासून पुलाचे काम अर्धवट असून यावरून धोकादायक पद्धतीने प्रवास सुरू आहे. यशवंतनगर परिसरामध्ये असणाऱ्या सरस्वती विद्यामंदिर या शाळेलगत रस्त्यावर नेहमीच सांडपाणी साचलेले असल्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते व रोगराईला आमंत्रण दिले जाते. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम होणे गरजेचे असून या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघात झाल्यास यास प्रशासन जबाबदार असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.
या रस्त्यावर खडीचे साम्राज्य पसरले असून अवजड वाहने गेल्यानंतर खडी उखडण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे दुचाकीस्वार जखमी होत आहे. दुग्ध व्यवसायिकांना या परिसरातून जाताना अनेक वेळा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
‘‘खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना सायकल घेऊन शाळेत येताना मोठी कसरत करावी लागते. अपघाताची दाट शक्यता आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अनेक वेळा विद्यार्थ्यांचे गणवेश पाणी उडाल्याने खराब होतात.’’
- सुरेश झेंड, अध्यक्ष, सरस्वती शिक्षण संस्था
‘‘माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे यशवंतनगर ते वराळे फाटा यासाठी काँक्रिट रस्त्याची मागणी केली आहे.’’
- नितीन मराठे, माजी जिल्हा परिषद सदस्य
PNE23T46958