
मराठवाड्याच्या विकासासाठी भूमिपुत्रांनी योगदान द्यावे भारतीय किसान संघाचे चंदन पाटील यांचे आवाहन
पिंपरी, ता. ६ : महिला सक्षमीकरण, मराठवाड्यातून होत असलेले स्थलांतर, यशस्वी युवा उद्योजक वाढवणे, महाविद्यालयीन विद्यार्थी विकास आणि शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. या माध्यमातून पुणे व पिंपरी-चिंचवडस्थित मराठवाडा वासियांनी योगदान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन भारतीय किसान संघांचे चंदन पाटील यांनी केले.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून, भारतीय किसान संघ प्रणित सावड मंचच्यावतीने पिंपरी-चिंचवडमधील स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीचे आकुर्डी येथे आयोजन केले होते. यावेळी मराठवाडा जनविकास संघांचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, निवृत्त कृषी उपसंचालक पांडुरंग सिगेदार, कृषितज्ज्ञ दिलीप बारडकर, शशिकांत गव्हाणे, सूर्यकांत कुरुलकर, शिवाजी डोंगरे, शंकर तांबे, राजेंद्र गाडेकर, श्रमिक गोजमगुंडे, वसंत आंग्रे, अमोल लोंढे, सुनील काकडे, प्रशांत फड, अनिल व्यास, धनाजी येळकर, किशोर अटरगेकर, गोरख भोरे, मारोती आवरगंड, बाबासाहेब सुकाळे उपस्थित होते.
या बैठकीत मराठवाड्यातील समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. अरुण पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील मराठवाडावासीय बांधव एकत्र येत आहेत ही स्वागतार्ह गोष्ट आहे. या समस्यांवर आपापल्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्वांनी एका मंचावर एकत्रित येण्याची गरज होती.
नितीन चिलवंत यांनी महाराष्ट्र दिन आणि मराठवाड्याचे योगदान यावर मार्गदर्शन केले. दिलीप बारडकर यांनी मराठवाड्यासाठी सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले. शशिकांत गव्हाणे यांनी सावडची मराठवाड्यातील रचना समजून सांगितली. सुरेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले व अनिल व्यास यांनी आभार मानले.