महागाईचा फटका ‘थाळी’लाही

महागाईचा फटका ‘थाळी’लाही

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेव
पिंपरी, ता. ९ : ‘लॉकडाउन’ काळात कमी लोकांमध्ये लग्नसोहळे उरकण्यात येत होते. पण या दोन वर्षांत वाढत्या महागाईमुळे लग्नकार्यातील सर्वच घटकांनी ‘भाव’ खायला सुरुवात केली आहे. मुख्यत्वे लग्नातील ‘मेन्यू’ महागला आहे. परिणामी, केटरिंग चालकांनी थाळीमागे सरासरी १०० ते १५० रुपयांची वाढ केली. आता लग्नाचा खर्च काढताना ‘पंगती’साठी जास्तीचे ‘बजेट’ काढून ठेवावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जेवण हा चर्चेचा विषय
‘नवरा येतो नवरीसाठी अन्‌ वऱ्हाड येते जेवण्यासाठी’ अशी म्हण आहे. त्यामुळे लग्नात जेवण चांगले द्यायचे असे वर व वधू या दोन्ही मंडळींकडून आग्रह असतो. त्यामुळे लग्नात आलेल्या दोन्हीकडील वऱ्हाड मंडळींना जेवण रुचकर मिळावे तसेच कमी पडता कामा नये, याची खासकरून काळजी घेतली जाते. त्यामुळे ग्रामीण असो की शहरी भाग लग्नातील जेवण हा एक चर्चेचा भाग असतो.

पंगतीसाठी मोजावी लागतेय मोठी रक्कम
यंदा विवाह मुहूर्त जास्तच असल्याने धूमधडाका पाहायला मिळत आहे. अनेकांची लग्नाची तयारी सुरू झाली आहे. तारखा ठरल्या आहेत. तर काहींची तब्बल दोन वर्षांनंतर लग्नाची जुळवाजुळव सुरू आहे. दरम्‍यान, तीन वर्षांपूर्वी कोरोना काळात वीस व्यक्तींना परवानगी देण्यात आल्याने लग्नसोहळे थोडक्यात आणि कमी खर्चात आटोपण्याची वेळ आली होती. आता मात्र लग्नाची बडी मेजवानी देण्यासाठी अनेकांची तयारी सुरू आहे. पण गेल्या दोन वर्षांत सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहे. त्याचा परिणाम लग्न सोहळ्यावर झाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरसह खाद्य पदार्थांचे दर वाढल्याने आता कॅटरर्सनींदेखील ताटाची किंमत वाढविली आहे. त्यामुळे आता लग्नाचा खर्च काढताना पंगतीसाठी लाखो रुपयांची जुळवाजुळव करावी लागत आहे.

मजुरीच्या खर्चातही वाढ
अन्नधान्यावरही जीएसटी लागू झाल्याने ‘केटरिंग’चा खर्च वाढला आहे. तसेच तेल, गहू, विविध प्रकारच्या डाळी, सुकामेवा आदींचे दरही वाढले आहे. वाढत्या महागाईमुळे मजुरीच्या खर्चातही पूर्वीच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे परिणामी ‘केटरिंग’ चालकांनी थाळी मागे १०० ते १५० रुपये वाढविले आहेत. सद्य:स्थितीत दीडशे रुपयांपासून पुढे थाळी असल्याची माहिती देण्यात आली. काही ‘बॅक्वेंट हॉल’मध्ये सिल्‍व्हर, गोल्ड आणि डायमंड अशा थाळींचे प्रकार आहे. त्या थाळीचे दर पाचशे ते हजाराच्या घरात आहेत.

‘केटरिंग’ व्यवसायाला चटके
लग्नसमारंभ म्हटले की, आनंदाचा क्षण असतो. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी सर्व आप्तेष्टांनी उपस्थित राहावे, त्यांच्यासाठी जेवणावळी द्याव्यात, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. जेवणाचा बेत कसा होता, यावरून विवाहसोहळा कसा आलिशान झाला, याविषयी चर्चा होते. मात्र, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यात स्वयंपाकाचा गॅस महागला, इंधनदरात वाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. किरणामालाचे व इतर साहित्याचे भाव वाढल्याने ‘केटरिंग’ व्यवसायाला देखील याचे चटके बसू लागले आहेत.

‘‘अन्नधान्यात महागाई वाढल्याने केटरिंग चालकांनी थाळीमागे सरासरी १०० ते १५० रुपयांची वाढ केली. त्यामुळे मर्यादित लोकांच्या उपस्थित सोहळा उरकण्यास प्राधान्य द्यावे लागते आहे. थाळीतील वस्तूंचे दरही पूर्वीच्या तुलनेत वाढले आहे. सर्व वस्तूंच्या शुल्कातही वाढल्याने विवाहमधील थाळींचे बजेट वाढले आहे.’’
- अमित फटांगरे, संचालक, सीझन बॅक्वेंट हॉल ॲन्ड केटरिंग.

विवाह थाळीचे प्रकार - एकूण पदार्थ - पूर्वीचे दर - आताचे दर (रुपयांत)
सिल्‍व्हर - १६ - ५०० -६३०
गोल्ड - २३ - ६००-७४५
डायमंड- ३२ - ८२५ - ९२५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com